थेट AK-47 मधून गोळीबार, तीन विद्यार्थी जखमी, बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलन चिघळलं
आंदोलने भडकवण्याचा आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा आरोप करत, भाजपने माफीची मागणी केली आहे.
बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलनात थेट AK-47 ने गोळीबार (Bihar) करणाऱ्या एसपी पुरण झा यांचा अंगरक्षक अभिषेक पटेलला निलंबित करण्यात आलं आहे. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं आहे. आरजेडीचे राज्यसभा खासदार मनोज झा यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. या प्रकरणावर उद्या (28 जुलै) सुनावणी होणार आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मुद्द्यावरून सरकारवर निशाणा साधत लिहिलं, संपूर्ण व्यवस्थाच घातक आहे. दरम्यान, सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनी विद्यार्थ्यांवरील कारवाई सहन केली जाणार नाही, असं म्हटलं आहे. विद्यार्थी संघटनांच्या बिहार बंद आणि आंदोलनादरम्यान सिवानमध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती. आंदोलनादरम्यान, एसपी पुरण झा यांच्या अंगरक्षकाने जमावाच्या दिशेने एके-47 ने गोळीबार केला, ज्याचा व्हिडिओ समोर आला.
व्हिडिओ समोर येताच, पोलिसांच्या कृतीवर आणि बळाच्या वापरावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले. प्रकरण चिघळल्यानंतर, पोलीस मुख्यालयाने संपूर्ण घटनेचा अहवाल मागवला. प्राथमिक तपासात व्हिडिओची पुष्टी झाल्यानंतर, संबंधित अधिकाऱ्याला तात्काळ निलंबित करण्याचे आदेश जारी करण्यात आले. या प्रकरणी विभागीय चौकशीही सुरू करण्यात आली आहे. तपास अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल.
25 जुलै रोजी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार दगडफेक आणि लाठीचार्ज झाला. काही आंदोलक गांधी मैदानातील मंचावर चढून तेथून पोलिसांवर दगडफेक करू लागले, असा आरोप आहे. यानंतर, पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी आधी अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या आणि नंतर लाठीचार्ज केला. पोलिसांच्या कारवाईनंतर, आंदोलकांनी गांधी मैदान सोडले आणि शहराच्या विविध भागांमध्ये पांगले. दगडफेकीत एसपी पुरण झा यांच्या हाताला दुखापत झाली.
सिवानमधील गोळीबारात तीन विद्यार्थी जखमी झाले. दोघांच्या मानेला गोळी चाटून गेली, तर एका विद्यार्थ्याच्या मांडीत गोळी अडकली आहे. मानेत गोळी लागल्याने गंभीर अवस्थेत असलेल्या एका विद्यार्थ्याला शनिवारी पाटणा येथे हलवण्यात आले. इतर दोन विद्यार्थ्यांना नंतर पाटणा येथे दाखल करण्यात आले. राहुल गांधींनी या संपूर्ण मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. त्यांनी एका सोशल मीडिया पोस्टद्वारे प्रश्न उपस्थित केले. त्यांनी लिहिले, “संपूर्ण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या विरोधात घातक आहे.
बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर AK-47 चा वापर झाल्याचे वृत्त आहे आणि शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्यावर एफआयआर दाखल केले जात आहेत.” मोदीजी, विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर दाखल होणार नाहीत आणि त्यांची सुटका केली जाईल, हे तुमचे वचन कुठे आहे? उलट, त्यांच्यावर प्राणघातक हल्ले आणि क्रूरता केली जात आहे. दिल्लीत विद्यार्थ्यांवर पेलेट गनचा वापर झाला, तर बिहारमध्ये एके-47 चा. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार किंवा दिल्ली असो, सर्वत्र पद्धत तीच आहे. मी हे आधीही सांगितले आहे, हे सरकार खोटारडे आहे.
सुधारणा करणे त्यांच्या आवाक्याबाहेर आहे. ते आपल्या शब्दावरून फिरतील आणि प्रत्येक डावपेच वापरून विद्यार्थ्यांचा आवाज दाबतील. मोदीजी, देशातील विद्यार्थ्यांची माफी मागा. आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांना चिरडणाऱ्यांवर कारवाई करा, विद्यार्थ्यांवर नाही. भाजपने राहुल गांधींच्या आरोपांना “अफवा” आणि दिशाभूल करणारे म्हटले आहे. आंदोलने भडकवण्याचा आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा आरोप करत, भाजपने माफीची मागणी केली आहे.
बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी विचारलं, ‘बिहारमध्ये कोणाच्या आदेशाने एके-47 चालवण्यात आल्या?’ तुम्ही व्हिडिओ पाहिल्यास, एके-47 मधून हवेत गोळीबार झाला नाही, तर लक्ष्य साधून गोळीबार करण्यात आला. तीन विद्यार्थ्यांना गोळ्या लागल्या.’ एके-47 चालवणाऱ्या एका जवानाचा व्हिडिओ शेअर करत त्यांनी लिहिले, ‘उद्या कोणताही पोलीस कोणत्याही नेत्यावर, मंत्र्यावर किंवा अगदी मुख्यमंत्र्यांवरही, कधीही, कुठंही, कोणत्याही कारणाशिवाय गोळीबार करू शकतो का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.