‘तुम्ही भाजपाचे आहात का?’ पत्रकाराला राहुल गांधींचा सवाल; संसद परिसरातील घटना चर्चेचा विषय
आज संसद भवन परिसरात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि एका पत्रकारामधील संवाद चर्चेचा विषय ठरला.
Rahul Gandhi’s question to the journalist : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि दिल्लीतील जंतर-मंत्र येथे आंदोलकांवर झालेल्या पोलिसी कारवाईचे मुद्दे चांगलेच गाजत आहेत. या पार्श्वभूमीवर आज संसद भवन परिसरात काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि एका पत्रकारामधील संवाद चर्चेचा विषय ठरला. पत्रकाराने जंतर-मंतर आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या मागण्यांबाबत प्रश्न विचारताचराहुल गांधी यांनी थेट उत्तर देण्याऐवजी, तुम्ही भाजपकडून आला आहेत का? असा प्रतिप्रश्न केला. या घटनेची राजकीय वर्तुळात आणि सामाजिक माध्यमांवर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
नीट परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि पेपरफुटीच्या आरोपांविरोधात दिल्लीतील जंतर-मंतर येथे अनेक दिवसांपासून विद्यार्थी आंदोलन करत आहेत. या आंदोलनकर्त्यांनी संसदेकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केल्यानंतर पोलिसांनी त्यांना रोखले. यावेळी आंदोलक आणि सुरक्षा दलांमध्ये धक्काबुक्की आणि झटपट झाल्याचे समोर आले. या घटनेत काही विद्यार्थी तसेच काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती देण्यात आली होती.
आज जखमी पोलीस कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांनी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना भेडसावणाऱ्या अडचणींकडे सरकार आणि विरोधकांनीही लक्ष द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच संसद भवनासमोर कर्तव्य बजावत असताना जखमी झालेल्या पोलिसांच्या प्रश्नांवर संसदेत चर्चा व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
भाजपला धक्का! बांकीपूरमध्ये प्रशांत किशोर तर दतियात काँग्रेसचे घनश्याम सिंह, रुद्र रिसर्चचा एक्झिट पोल काय सांगतो?
याच पार्श्वभूमीवर संसद भवन परिसरात प्रवेश करत असताना राहुल गांधी यांना एका पत्रकाराने प्रश्न विचारला. “जंतर-मंतर आंदोलनादरम्यान जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांच्या मागण्यांबाबत विरोधी पक्ष संसदेत आवाज उठवणार का?” असा थेट सवाल पत्रकाराने केला. मात्र राहुल गांधी यांनी या प्रश्नावर कोणतीही सविस्तर प्रतिक्रिया न देता, “तुम्ही भाजपाकडून आला आहात का?” असा प्रतिप्रश्न केला. पत्रकार आणि राहुल गांधी यांच्यातील हा संवाद काही क्षणांतच चर्चेचा विषय बनला.
सध्या संसदेत नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, पोलिसांची कारवाई आणि सरकारची भूमिका यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे. काँग्रेससह विरोधी पक्षांकडून विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे, तर सत्ताधारी पक्ष विद्यार्थ्यांच्या आंदोलनाच्या नावाखाली झालेल्या हिंसाचाराचा मुद्दा उपस्थित करत आहे.
Cauvery Water row : पाण्यावरून कर्नाटक-तामिळनाडूमध्ये पुन्हा वाद उफाळला ! सीएम विजयच्या चित्रपटाला फटका!
राहुल गांधी यांनी यापूर्वीही जंतर-मंतर येथील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला असून, आंदोलकांवरील पोलिसी कारवाईबाबत केंद्र सरकारवर टीका केली आहे. मात्र जखमी पोलिसांच्या प्रश्नावर विचारलेल्या या प्रश्नाला त्यांनी थेट उत्तर न दिल्याने नव्या राजकीय चर्चांना तोंड फुटले आहे.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर भाजप आणि काँग्रेसकडून अधिकृत प्रतिक्रिया येण्याची शक्यता असून, संसदेतही हा मुद्दा पुढील काही दिवस गाजण्याची चिन्हे आहेत. नीट पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि त्यावर झालेली पोलिसी कारवाई या मुद्द्यांभोवती देशातील राजकारण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.