मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर भाजप – महाआघाडीची शक्ती पणाला…

मराठवाड्याच्या प्रवेशद्वारावर भाजप – महाआघाडीची शक्ती पणाला…

प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी)
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar)येथे उद्या (दि.2) महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) सभा होत आहे. शहरात दोन समाजात झालेल्या दंगलींच्या पार्श्वभूमीवर ही सभा होत आहे. राज्यात सत्ता गेल्यानंतर महाविकास आघाडीची ही पहिली सभा होत आहे. उद्या होणाऱ्या या सभेला अतिशय संवेदनशील (Very sensitive)आणि भावनिक किनार (emotional edge)देखील आहे. खेड (Khed)आणि मालेगाव (Malegaon)येथे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray)सभेला झालेली गर्दी ही केवळ ठाकरे गटाला नव्हे तर काँग्रेस (Congress),राष्ट्रवादी काँग्रेसला(NCP) देखील उभारी देणारी आहे.

महाविकास आघाडीची होणारी सभा अनेक कारणाने महत्त्वाची आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठिशी भक्कमपणे उभा राहिलेला इथला मतदार, शहराचे छत्रपती संभाजीनगर असे झालेले नामकरण, मुस्लीम मतांसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि एमआयएममध्ये चाललेली चढाओढ, त्यात उद्धव ठाकरेंना खेड आणि मालेगाव येथे मुस्लिम समाजाचा मिळालेला उत्स्फुर्त पाठिंबा ही एक बाजू आहेच. तर दुसरीकडे ध्रुवीकरणात हिंदू मतात अधिकाधिक टक्का वाढावा यासाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटात सुरु असलेली चढवोढ यादृष्टीने सर्वच पक्षांनी आपली ताकद पणाला लावली आहे.

Chandrkant Patil यांनी पवारांना पुन्हा डिवचलं : कुणी पहाटेच्या अंधारात मुख्यमंत्री होतो…

छत्रपती संभाजीनगर येथे दोन गटात झालेल्या दंगलीला भाजप एमआयएम कारणीभूत आहे. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री संदीपान भुमरे हे अपयशी ठरले, असे आरोप करत महाविकासआघाडीचे सर्व नेते एकत्रितपणे भाजप विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्यावर तुटून पडले आहेत. याला प्रत्युत्तर देण्यात भाजपला उशीर झाला? की भाजप एमआयएम नेत्यांना बाजू मांडता आली नाही? म्हणूनच की काय, देवेंद्र फडणवीसांना स्वतः तर उतरावे लागले. पण आपल्या हक्काच्या दूत आलेल्या गिरीष महाजनांना या ठिकाणी परिस्थिती हाताळण्यासाठी पाठवावे लागले. या सर्व घटनेपासून मुख्यमंत्री अनभिज्ज्ञ होते का? की त्यांना या सर्वांपासून लांब ठेवण्यात आले. या घटनेचा सरकार आणि विरोधक यांच्यावतीने देवेंद्र फडणवीस हेच केंद्रबिंदू राहिले आहेत.

ही दंगल कशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कशी आटोक्यात आणली? हे सांगण्यासाठी भाजपला अखेर जाहिरातीचा आधार घ्यावा लागला. याकडे ही जाणकार बारकाईने पाहात आहेत. छत्रपती संभाजीनगर हे केवळ शहर नाही. तर मराठवाड्याचे प्रवेशद्वार आहे. मराठवाडा हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. त्यात काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसची मिळालेली साथ ही महाविकास आघाडीची ताकद वाढवणारी आहे.

मराठवाडा हा मराठा, मुस्लीम आणि दलित बहुल भाग आहे. डीएमएम हा काँग्रेस राष्ट्रवादीचा जुना मतदार एकसंघपणे त्यांच्याकडे वळू लागला. त्यात हिंदू मतांची शिवसेनेची साथ अधिक मजबुतीने ताकद देणारी आहे. स्वतः संभाजीनगर, जालना , परभणी हा शिवसेनेचा, नांदेड हिंगोली, धाराशिव, बीड आणि लातूर या जिल्ह्यांत राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी बाजू मजबूत आहे. या सर्वच मतदार संघात या तिन्ही पक्षांना एकमेकांची साथ मिळाल्यास भाजपाची लोकसभा आणि विधानसभेची सर्व गणितं बिघडणारी आहेत.

मराठवाड्यात आठ लोकसभा आणि 48 विधानसभा मतदार संघ येतात, म्हणूनच मराठवाड्यात वातावरण निर्मितीसाठी संभाजीनगरची सभा भाजप सेना आणि महाविकास आघाडीसाठी महत्त्वपूर्ण आहे. या सभेला अधिकाधिक ध्रुवीकरण आपल्या बाजूने व्हावे हा भाजपाबरोबर महाविकास आघाडीचा प्रयत्न असणार आहे. सभा कशी होते याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube