Chhagan Bhujbal : ..म्हणून शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला; भुजबळांनी सांगितलं नक्की काय ठरलं होतं?

Chhagan Bhujbal : ..म्हणून शरद पवारांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला; भुजबळांनी सांगितलं नक्की काय ठरलं होतं?

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काही दिवसांपू्र्वी लोक माझे सांगाती या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत खळबळ उडवून दिली होती. या निर्णयाद्वारे त्यांनी भाकरी फिरवली खरी पण, त्यांचा हा निर्णय पक्षातील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना रुचला नाही. राजीनामा मागे घेण्याची विनंती करण्यात आली. त्यानंतर पवारांनीही राजीनाम मागे घेत नव्या जोमाने कामाला सुरुवातही केली. मात्र, या सगळ्यात पवारांनी राजीनामा का दिला? या प्रश्नाचं उत्तर मिळालं नव्हतं त्याच प्रश्नाचं उत्तर अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिलं.

मंत्री भुजबळ यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक धक्कादायक खुलासे केले. शरद पवार यांच्या अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावरही त्यांनी भाष्य केलं. शरद पवार यांनी राजीनामा दिला. तेव्हा सुप्रिया सुळे यांना अध्यक्ष करण्याचं ठरलं होतं. सुळे या अध्यक्ष होतील मग राष्ट्रवादी भाजपसोबत जाईल, असं ठरलं होतं. पंधरा दिवस पवारांच्या घरात चर्चा झाली असावी. अजितदादांना ते माहित होतं. सुळे यांच्या नेतृत्वात भाजपसोबत जायचं ठरलं होतं म्हणूनच शरद पवार यांनी राजीनामा दिला, असा खळबळजनक गौप्यस्फोट भुजबळ यांनी केला.

PM Modi यांना आत्ताच हिमालयात पाठवा; प्रकाश आंबेडकरांचा टोला

पवारांचं वक्तव्य अन् फडणवीस सावध झाले

2014 साली विधानसभेच्या निवडणुका आल्या त्यावेळी शिवसेना भाजपने युती तोडली. तेव्हा भाजपने पवारांना सांगितलं की, आम्ही शिवसेनेला सोडतो. तुम्ही काँग्रेसला सोडा. त्यामुळेच राष्ट्रवादीने कोणतही कारण नसताना काँग्रेसला सोडलं. पृथ्वीराज चव्हाणांच्या सरकारचा पाठिंबा काढला. तेव्हा असं ठरलं होतं की, स्वतंत्र निवडणूक झाल्यानंतर काही दिवस भाजपचं सरकार चालेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील होईल.

तसेच मतमोजणीच्या आदल्या दिवशी सुद्धा भाजपचा फोन आला की, उद्या मतमोजणी आहे. जर कमी मतं पडली तर राष्ट्रवादीने बाहेरून पाठिंबा द्यावा त्याला शरद पवार हो म्हटले होते. तेव्हा प्रफुल्ल पटेलांनी सरकारला पाठिंबा जाहीर केला. एकनाथ शिंदे विरोधी पक्षनेते झाले. त्यानंतर शरद पवारांनी एक वक्तव्य केलं त्यामुळे देवेंद्र फडणवीस सावध झाले. भाजपने आमचा पाठिंबा कायमसाठी गृहीत धरू नये. त्यांच्या या वक्तव्याने फडणवीस सावध झाले. त्यांनी समजून घेतलं की काही तरी गडबड आहे. त्यानंतर त्यांनी शिवसेनेशी युती कायम ठेवत त्यांना मंत्रिपदं दिली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube