Maharashtra Bhushan Award ceremony : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेड आक्रमक

Maharashtra Bhushan Award ceremony : सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, संभाजी ब्रिगेड आक्रमक

Heat stroke Death in Maharashtra Bhushan Award ceremony : राज्य सरकारच्या वतीने मुंबईतील खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. ज्येष्ठ निरुपणकार, पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात येणार आला. यावेळी लाखो लोकांनी या ठिकाणी हजेरी लावली. पण कार्यक्रमानंतर अनेकांना उष्मघाताचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

उष्माघाताचा त्रासामुळे (Heat stroke) 11 हून अधिक श्री सेवकांचा दुदैवी मृत्यू झाला. तर अत्यवस्थ असलेल्या अनेक सदस्यांवर कामोठे येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामुळे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागले आहे. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन अत्यवस्थ रुग्णांची विचारपूस केली. तसेच राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच अत्यवस्थ श्री सदस्यांच्या उपचाराचा खर्च सरकार करेल अशी घोषणा देखील शिंदे यांनी केली.

मात्र यावरून आता विरोधी पक्षासह सर्वच स्तरावरून शिंदे-फडणवीसांवर टीका केली जात आहे. यामध्ये आता महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील प्रकारानंतर संभाजी ब्रिगेड ही संघटना देखील आक्रमक झाली आहे. त्यांनी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात जाणीवपूर्वक हत्या घडवून आणल्याचा आरोप राज्य सरकारवर केला आहे.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराचा इतिहास अन् मानकरी

यावेळी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले,’या पुरस्कर सोहळ्यात उष्माघाताने मृत्यू झालेल्यांची नैतिक जबाबदारी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच सांस्कृतिक मंत्री आणि आप्पासाहेब धर्माधिकारी यांची आहे. या सर्वांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण सरकारने जाणीवपूर्वक हत्या घडवून आणली. तर या प्रकरणाची नैतिक जबाबदारी म्हणून मुख्यंमंत्र्यानी राजीनामा द्यावा अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.’

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube