संजय राठोडही भिडले ! म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन; भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांना पाठिशी घालू नका
![संजय राठोडही भिडले ! म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन; भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांना पाठिशी घालू नका संजय राठोडही भिडले ! म्हणाले, भ्रष्टाचाराचे आरोप तथ्यहीन; भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांना पाठिशी घालू नका](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/04/Untitled-design-2023-04-19T150538.952.jpg)
Sanjay Rathod : शिंदे गटाचे नेते तथा मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्या कार्यालयावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात येत आहेत. राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप औषध विक्रेते संघटनेने केला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पत्र पाठवत तक्रार केली आहे. या तक्रारीकडे गांभीर्याने लक्ष द्यावं अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
यानंतर आता या प्रकरणावर मंत्री संजय राठोड यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले आहे, की ‘महाराष्ट्र राज्य औषध विक्रेता संघटनेने जे आरोप केले आहेत ते तथ्यहीन आहेत. दबाव टाकण्यासाठी हे आरोप आहेत असे मला वाटते. औषध उत्पादक, विक्रेता व वितरक यांच्यावर झालेल्या अनियमिततेवर क्षेत्रीय अधिकारी सुनावणी घेऊन अर्धन्यायिक आदेशाचे पालन करत असतात. सुनावणी न घेता या शिक्षेवर स्थगिती मिळावी’, अशी संघटनेची मागणी सातत्याने राहते.
Mahesh Tapase : संजय राठोडांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्या
‘औषध विक्रेत्यांचे परवाना निलंबन, परवाना रद्द तसेच काही प्रकरणात फौजदारी गुन्हे दाखल आहेत. अशी जवळपास सात हजार प्रकरणे शासन पातळीवर प्रलंबित आहेत. यामध्ये परवाना रद्द असलेली तीन हजार दुकाने असतील असे मला वाटते. झोपेच्या गोळ्या, कफ सिरपचा बराच वेळा नशेसाठी वापर होतो. ही औषधे चढ्या दराने विकून नफा कमावण्याचे प्रकार होत असल्याच्याही तक्रारी आहेत. हे सर्व समाजहिताच्या विरोधात आहे.’
‘अशा प्रकारे भ्रष्टाचाराचे आरोप करून दबाव टाकणे चुकीचे आहे. आज विधिमंडळात याबाबत चर्चा झाली आहे. माझ्या कार्यालयात पैशांची मागणी करण्यात येणं, केवळ दबावासाठी हे आरोप आहेत. पूर्वी रद्द केलेल्या परवान्यांवरील स्थगिती हटवून निर्णय देऊ नये यासाठीच हा दबाव आणला जात आहे’, असा आरोप मंत्री राठोड यांनी यावेळी केला.
‘औषध विक्रेते संघटनांनी कारवाईला विरोध करू नये. भ्रष्टाचारी औषध विक्रेत्यांना पाठिशी न घालता शासनाला सहकार्य करावे. मी याबाबत बैठक घेऊन चर्चेला केव्हाही तयार आहे. पण अशा पद्धतीने आरोप करणे पत्र लिहीणे चुकीचे आहे.’
अधिकाऱ्यांची कारवाई योग्य ?
‘एफडीएकडून नियमांचे पालन करूनच कारवाई केली जाते. अधिकारी कारवाई करतात नंतर प्रकरणे मंत्रालयात येतात. तर मग त्यांनी केलेली कारवाई चुकीची समजून मी जर स्टे दिला तर त्या अधिकाऱ्यांचे मनोधैर्य खच्ची होते. प्रत्येक प्रकरणात विचार करूनच मी निर्णय देत असतो’, असे स्पष्ट करत संघटनेने सहकार्याची भूमिका ठेवावी असे आवाहन राठोड यांनी केले आहे.