संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल; पोलीसांचे आभार, पण बाकीच्या तक्रारींचं काय? रोहित पवारांचा सवाल

Rohit Pawar; संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवारांनी पोलीसांचे आभार मानले. पण इतर तक्रारींचं काय? असा सवाल उपस्थित केला.

Rohit Pawar on Sanjay Gaikwad

Rohit Pawar on Sanjay Gaikwad-Shweta Mahale Case: शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप आमदार श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाबाबत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. श्वेता महाले यांच्याबाबत केलेल्या व्यक्तव्यामुळे पोलीसांनी संजय गायकवाडांवर गुन्हा नोंद करुन घेतला. त्यामुळे रोहित पवारांनी पोलीसांचे आभार मानले. तसेच कोथरुड पोलीसांनी आरती रेडकर, सोनाली कांबळे यांनी केलेल्या तक्रारीवरुन गुन्हा नोंद करुन घेतला नाही, याकडेही रोहित पवारांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून लक्ष वेधले.

यंदा वाद नाही, थेट परवानगी! 20 ऑक्टोबरला शिवाजी पार्कवरच होणार ठाकरेंचा दसरा मेळावा

रोहित पवारांची पोस्ट

आमदार श्वेताताई महाले यांच्यावर अश्लील भाषेत टिप्पणी करणाऱ्या आमदार संजय गायकवाड यांच्यावर तत्काळ गुन्हा नोंद करून घेतल्याबद्दल पोलीसांचे आभार. दोन दिवसांपूर्वी कोथरूड पोलीस स्टेशनला आरती रेडेकर-आंबी, सोनाली कांबळे यांनी देखील विनयभंगाचा दखलपात्र गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली, आम्ही चार तास ठिय्या मांडून बसलो, परंतु पोलीसांनी गुन्हा नोंद करून घेतला नाही. संतोष पंडित प्रकरणात रात्री 1 वाजता गुन्हा नोंद करून तासाभरात अटक सुद्धा केली होती परंतु सोनाली कांबळे यांनी दखलपात्र गुन्ह्याची तक्रार देऊन 5 दिवस होऊन गेले तरी दखल घेतली नाही.

BRICSचा दुसरा दिवस मोदींसाठी महत्त्वाचा; महत्त्वाच्या नेत्यांशी जागतिक मुद्द्यांवर चर्चा

संविधानानुसार कायद्यासामोर प्रत्येक नागरिक समान असताना श्वेताताईंशी संबधित तक्रारीवर क्षणाचाही विलंब न लावता गुन्हा दाखल होतो, संतोष पंडितवर गुन्हा दाखल होतो तर मग सोनाली कांबळे, आरती रेडेकर-आंबी यांच्या दखलपात्र गुन्ह्याच्या तक्रारीवर गुन्हा का दाखल होत नाही? पोलीस संविधानाच्या विरोधात का वागत आहेत? पोलीस मुख्यमंत्र्यांच्या राजकीय आदेशाने काम करतात का?
पोलीस अधिकारी चांगले आहेत परंतु राजकीय दबावाने त्यांच्याकडून संविधानविरोधी कामे करून घेतली जात आहेत. सोनाली कांबळे, आरती रेडेकर-आंबी, संतोष पंडित, बुलढाणा केस या तिन्ही प्रकरणात पोलीस विभागाचा राजकीय सावळागोंधळ आणि संविधान विरोधी कारभार पुढं आला असून त्यामुळं पोलीस प्रशासन ‘मुख्यमंत्र्यांच्या ताटाखालचे मांजर’ झाले आहेत अशी सर्वसामान्य जनतेची भावना झाली आहे, हे दुर्दैव आहे.

महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; मुंबईसह अनेक जिल्ह्यांना अलर्ट

सिलेक्टिव्ह प्रकरणात राजकीय दबावाखाली खोटा गुन्हा दाखल करायचा आणि विरोधकांचा विषय असेल तर खऱ्या प्रकरणाताही गुन्हा दाखल करायचा नाही, हे बेकायदा आहे. हे प्रकरण आता हाय कोर्टापर्यंत पोचलं असून ज्यावेळी पोलीस विभागाच्या या संविधानविरोधी कामाची चौकशी होईल तेंव्हा संबंधित अधिकारी मात्र गोत्यात येतीलच पण त्यांचे राजकीय आदेशकर्तेही यातून सुटणार नाहीत, यात शंका नाही!

“बापासारखं शरीर कुठून आणणार?”;श्वेता महालेंना प्रत्युत्तर देताना संजय गायकवाडांची जीभ घसरली

दरम्यान, संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर रोहित पवारांनी पोलीसांच्या कारवाईचे स्वागत केले असले, तरी इतर प्रकरणांमध्ये तक्रार करूनही गुन्हा दाखल न झाल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. पोलीसांनी सर्व प्रकरणांमध्ये समान निकषाने आणि कोणत्याही राजकीय दबावाशिवाय कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

follow us