निवडणूक आयोग काम नीट करत नाही, एका ठिकाणी 140 लोकांचं मतदान; पवारांचा हल्लाबोल

Sharad Pawar : निवडणूक आयोग (Election Commission) त्यांचं काम योग्य पद्धतीने करत नाही, एक व्यक्ती राहते अशा ठिकाणी 140 लोकांनी मतदान केलं. त्यामुळं आम्हाला निवडणूक आयोगाकडून फार अपेक्षा नाहीत, अशी टीका शऱदचंद्र पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी केली.
राधाकृष्णन आमच्या विचारांचे नाहीत
शरद पवारांनी आज मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. ते म्हणाले, काल मुख्यमंत्री फडणीसांनी मला फोन केला. सी. पी. राधाकृष्णन यांना पाठिंबा द्यावा अशी त्यांनी विनंती केली. मी त्यांना सांगितलं ते शक्य नाही, ते आमच्या विचारांचे नाहीत. इंडिया आघाडीच्या बैठका झाल्या अन् आम्ही काल बी. सुदर्शन यांचा फॉर्मही भरला. राधाकृष्णन राज्यपाल असताना त्यांच्या समोर झारखंडचे सीएम सोरेन यांना अटक झाली, असं पवार म्हणाले.
पुढं ते म्हणाले, एनडीएकडे मतांची संख्या जास्त पण आम्ही चौकटीच्या बाहेर जाणार नाही. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणूकीसाठी आमची मत असली तरी आम्हाला चिंता नाही. खरंतर आम्ही सरकारचा विचार करत नाही तर निवडणूक आयोगाचा विचार करतो. निवडणूक आयोग त्यांचं काम योग्य पद्धतीने करत नाही, एक व्यक्ती राहते अशा ठिकाणी 140 लोकांनी मतदान केलं. त्यामुळं आम्हाला निवडणूक आयोगाकडून फार अपेक्षा नाहीत, असं पवार म्हणाले.
बिहार राजकीयदृष्ट्या जागृत राज्य आहे. राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळाला, असंही पवार म्हणाले.