Atul Londhe : ‘ती’ परंपरा भाजप सरकारचीच…,अतुल लोंढेंनी घेतला फडणवीसांचा समाचार

Atul Londhe : ‘ती’ परंपरा भाजप सरकारचीच…,अतुल लोंढेंनी घेतला फडणवीसांचा समाचार

मुंबई : विरोधकांना राजकीय वैमनस्यातून जेलमध्ये टाकण्याची परंपरा भाजपाचीच असल्याचा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul londhe) यांनी केला आहे. यावेळी अतुल लोंढे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीसांचा (Devendra Fadnvis) चांगलाच समाचार घेतल्याचं दिसून आलंय. फडणवीसांचे आरोप हास्यास्पद तर आहेच पण ‘चोराच्या उलट्या बोंबा’ प्रकारातील असल्याचा टोला त्यांनी लगावला आहे.

लोंढे म्हणाले, महाविकास आघाडी सरकार आपल्याला जेलमध्ये टाकणार होते. भाजपने मागील ८ वर्षांत ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकले आहे. मविआ सरकारमधील दोन मंत्र्यांनाही अशाच पद्धतीने जेलमध्ये पाठवले. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करुन ब्लॅकमेल करण्याचे राजकारणही भाजपानेच केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

तसेच तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांना एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या केवळ पत्राच्या आधारे अटक करुन सव्वा वर्षे जेलमध्ये टाकले आणि ज्या परमवीरसिंग यांनी ते खोटे पत्र पाठवले. त्यांच्यावर काहीच कारवाई झालेली नाही. कोर्टानेही जामीन देताना जे ताशेरे ओढले यातून हे एक षडयंत्र होते हे स्पष्ट झाले आहे.

कारवाईच्या नावाखाली १०० छापे मारुन देशमुखांच्या कुटुंबियांना नाहक त्रास दिला गेला. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही अशाच खोट्या प्रकरणात जेलमध्ये टाकले. माजी मंत्री नवाब मलिक यांच्यावरही २५ वर्षांचे जुने प्रकरण उकरुन काढून त्यांना जेलमध्ये पाठवले.

ही राजकीय दडपशाही भाजपानेच आणली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह काही राजकीय नेत्यांचे बेकायदेशीर फोन टॅपिंग करण्यात आले. नाना पटोले यांचे नाव अजमज खान ठेवून ते अमली पदार्थ्यांचा व्यापार करतात. हे दाखवून फोन टॅपिंग केले. याप्रकरणी आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना ईडी सरकारकडून क्लीट चिट देण्याचा प्रयत्न झाला पण तो कोर्टात टिकू शकला नसल्याचंही त्यांनी म्हंटलंय.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube