माळशेज घाटात रस्ता खचला, मुंबईकडं जाणारी सर्व वाहतूक बंद; नागरिकांना पर्यायी मार्ग कोणते?
माळशेज घाट मार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 61 वरील करंजाळे (ता. जुन्नर) परिसरात रस्ता खचल्याने माळशेज घाट मार्गे मुंबईकडं जाणारी सर्व प्रकारची वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यामुळं अहिल्यानगर तसंच पुणे येथून मुंबईकडं जाणाऱ्या वाहनचालकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं आवाहन प्रशासनाने केलं आहे. वाहतूक कोंडी, अपघात तसेच कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ नये, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जारी केले आहेत. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईकडे जाणारी वाहतूक आळेफाटा नारायणगाव खेड चाकण तळेगाव (एमआयडीसी) लोणावळा खोपोली मुंबई या पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. दरम्यान, माळशेज घाट मार्गावरील रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून पर्यायी मार्गाचा वापर करावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
रस्त्याला शनिवारी मोठी भेग पडली होती. मात्र रात्रभर झालेल्या पावसानं रविवारी सकाळी रस्त्याखालची माती वाहून गेली आणि रस्ता सात फूट खचला. या घटनेनंतर बांधकाम विभागाने तातडीने धोकादायक भागाभोवती बॅरिकेड्स लावले आणि वाहतूक एकेरी करण्यात आली होती. मात्र आता ही वाहतूक पूर्ण बंद करण्यात आलीय.
पर्यायी मार्ग कोणता?
अहिल्यानगर कल्याण महामार्गाची वाहतूक माळशेज घाटातून बंद केल्यानंतर पर्यायी मार्गाने वळवण्यात आलीय. आळेफाटा इथून वाहतूक नारायणगाव-खेड-चाकण-तळेगाव (एमआयडीसी)-लोणावळा खोपोली-मुंबई या मार्गे वळवण्यात आली आहे.जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीसंदर्भात आदेश जारी केले आहेत.