गुरु-शिष्य परंपरेमुळे भारतीय संस्कृतीची जपणूक, नागेश पाटील यांचं प्रतिपादन
माणूस जन्माला आल्यानंतर जगायचे कसे, कोणते ध्येय गाठायचे, काय मिळवायचे आणि मोठे कसे व्हायचे यासाठी प्रेरणेचं महत्वं.
भारतीय संस्कृतीची जडणघडण आपल्या (Indian) पूर्वजांनी, महापुरुषांनी आणि संतांनी केली. तर ही संस्कृती पिढ्यान्पिढ्या आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे महान कार्य गुरु-शिष्य परंपरेने केले. भारत हा महान देश आणि महापुरुषांचा देश आहे. हे महापुरुष, संत आणि पराक्रमी राजे कसे घडले, हा प्रश्न इतिहासाला विचारला तर त्याचे एकच उत्तर मिळते, ते म्हणजे गुरु-शिष्य परंपरा, असे प्रतिपादन व्याख्याते नागेश पाटील यांनी केले.
जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट तर्फे आयोजित नऱ्हे येथील संस्थेच्या सभागृहात गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित स्व. तानाजी बाबर व्याख्यानमालेत ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.सुधाकर जाधवर व इतर मान्यवर देखील उपस्थित होते. नागेश पाटील म्हणाले, भारतीय संस्कृती ही जगातील इतर संस्कृतींपेक्षा वेगळी आणि वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती आहे. जगाच्या इतिहासात अशी संस्कृती कधी निर्माण झाली नाही आणि भविष्यातही होईल असं वाटत नाही. त्यामुळे भारतीय संस्कृतीला जागतिक स्तरावर एक वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
प्रत्येकाचे जीवन हे एका ध्येयासाठी असते. माणूस जन्माला आल्यानंतर जगायचे कसे, कोणते ध्येय गाठायचे, काय मिळवायचे आणि मोठे कसे व्हायचे, यासाठी प्रेरणेची आवश्यकता असते. ही प्रेरणा देणारा, योग्य दिशा दाखवणारा आणि जीवनाला आकार देणारा व्यक्ती म्हणजे गुरु होय. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर म्हणाले, भारतात वेदव्यासांपासून गुरु-शिष्य परंपरा अखंड सुरू आहे. अनेक साधुसंत, ऋषी-मुनी यांनी समाजाला ज्ञान दिले. गुरुंचे उपकार इतके मोठे आहेत की, त्यांच्या चरणी आपला जीव अर्पण केला तरी ते फेडता येणार नाहीत.
आजची शिक्षणपद्धती आल्यापासून गुरु-शिष्य नात्यात काही प्रमाणात दुरावा निर्माण झाला आहे. तरीही वेदव्यासांपासून डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्यापर्यंत अनेक महान गुरु भारतात होऊन गेले. स्वामी विवेकानंदांचे उदाहरण देताना ते म्हणाले, ‘माझ्या विचारांचे दहा तरुण मला द्या, मी संपूर्ण भारत बदलून टाकेन.’ आज आपण त्या विचारांचे तरुण घडवत आहोत का, हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.