भारताचा 67 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी

भारताचा 67 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ची आघाडी

गुवाहाटी : विराट कोहलीचे दमदार शतक आणि गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर भारताने पहिल्याच वनडे सामन्यात श्रीलंकेला धुळ चारली. कोहलीच्या शतकाच्या जोरावर भारताने श्रीलंकेपुढे 374 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेच्या संघाला चांगली फलंदाजी करत आली नाही आणि त्याला मानहानीकारक पराभव झाला. या विजयासह भारताने या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

श्रीलंकन कर्णधार दासून शनाकाने नाबाद 108 धावा ठोकत एक कडवी झुंज दिली, पण संघाला विजयी करण्यासाठी ही पुरशी नसल्याने अखेर श्रीलंका संघ पराभूत झाला आहे.

सामन्यात सर्वप्रथम श्रीलंका संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी निवडली. सलामीवीर रोहित शर्माने आपल्या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार मारत 67 चेंडूत 83 धावा केल्या. तर शुभमन गिलने 60 चेंडूत 70 धावांचे योगदान दिले. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने 29 चेंडूत 39 धावा केल्या.

विराट कोहलीने दमदार शतक लगावलं. विराटने 12 चौकार आणि 1 षटकार ठोकत 113 धावा केल्या. मात्र, याशिवाय श्रेयस अय्यर आणि हार्दिक पांड्यासारख्या फलंदाजांनी निराशा केली. श्रेयस अय्यरने 24 चेंडूत 28 धावा केल्या. तर हार्दिक पांड्याने 12 चेंडूत 14 धावा केल्या.

ज्यानंतर 394 धावा करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाचे बरेच फलंदाज अपयशी झाले. पाथुम निसांकाचे 72 तर धनंजया डिसिल्वाच्या 47 धावांनी संघाला तारलं. पण यासर्वाशिवाय अखेरपर्यंत झुंज दिली ती कर्णधार दासून शनाका याने.

दासूनने 12 चौकार आणि 3 षटकार ठोकत नाबाद 108 धावा केल्या, पण अखेर श्रीलंकेचा संघ 50 षटकात 8 गडी गमावून 306 धावाच करु शकला. या विजयासह तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube