50 दिवसांचा विजयी प्रवास! इम्तियाज अलींच्या ‘मैं वापस आऊंगा’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास

50 दिवस पूर्ण झाल्यानंतरही हा चित्रपट देश-विदेशातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित होत असून सध्या तो आठव्या आठवड्यात दाखल झाला आहे.

  • Written By: Published:
Untitled Design   2026 07 31T132701.385

Main Vapag Aagga created history at the box office : आजच्या काळात चित्रपटांचे थिएटरमधील आयुष्य दिवसेंदिवस कमी होत असताना दिग्दर्शक इम्तियाज अली यांच्या ‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटाने एक वेगळीच कामगिरी करून दाखवली आहे. प्रदर्शित होऊन तब्बल 50 दिवस पूर्ण झाल्यानंतरही हा चित्रपट देश-विदेशातील चित्रपटगृहांमध्ये यशस्वीपणे प्रदर्शित होत असून सध्या तो आठव्या आठवड्यात दाखल झाला आहे. यंदाच्या वर्षातील सर्वात मोठ्या ‘वर्ड ऑफ माऊथ’ यशोगाथांपैकी एक म्हणून या चित्रपटाकडे पाहिले जात आहे.

सुरुवातीला समीक्षकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळूनही चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर अपेक्षित सुरुवात मिळाली नव्हती. मात्र प्रेक्षकांच्या पसंतीमुळे आणि तोंडी प्रसिद्धीच्या जोरावर चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यापासून जोरदार मुसंडी मारली. दिवसेंदिवस अधिकाधिक प्रेक्षक चित्रपटाशी जोडले गेले आणि सहाव्या आठवड्यापर्यंत ‘मैं वापस आऊंगा’ हा व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी चित्रपट ठरला.

चित्रपटाची कथा, भावना, प्रेम आणि विरह यांचे इम्तियाज अली यांनी केलेले प्रभावी चित्रण प्रेक्षकांच्या मनाला भिडले. मात्र या यशामागे चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर राबवण्यात आलेल्या आगळ्यावेगळ्या प्रचार मोहिमेचाही मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही निर्मात्यांनी त्याचा प्रचार थांबवला नाही. स्वतः इम्तियाज अली यांनी देशातील 14 प्रमुख बाजारपेठांमधील 80 हून अधिक चित्रपटगृहांना भेट देत प्रेक्षकांशी संवाद साधला. त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आणि त्यांचे आभार मानले. या भेटींचे व्हिडीओ आणि अनुभव समाजमाध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले, ज्यामुळे चित्रपटाची लोकप्रियता आणखी वाढली.

सिसपे घोटाळ्यातील आरोपींचा दुबई ते फिजीपर्यंत पाठलाग; खासदार निलेश लंके यांचा मोठा दावा

देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही चित्रपटाला मोठे यश मिळाले. सुरुवातीला 59 देशांमधील 804 पडद्यांवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाचा विस्तार नंतर आणखी 15 युरोपीय देशांमध्ये करण्यात आला. विशेष म्हणजे हिंदी पट्ट्याबरोबरच बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता यांसारख्या शहरांमध्येही चित्रपटाने उत्तम कामगिरी केली. त्यामुळे त्याचे आकर्षण केवळ एका प्रदेशापुरते मर्यादित नसल्याचे स्पष्ट झाले.

चित्रपटाच्या 50 दिवसांच्या यशस्वी प्रवासाबद्दल बोलताना इम्तियाज अली म्हणाले, “चित्रपटगृहांमध्ये 50 दिवस पूर्ण करणे ही आजच्या काळात अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. ‘मैं वापस आऊंगा’ने हा टप्पा गाठला आहे आणि यासाठी मी सर्वप्रथम प्रेक्षकांचे आभार मानतो. त्यांनी चित्रपटाशी भावनिक नाते जोडले, इतरांनाही चित्रपट पाहण्यास प्रवृत्त केले आणि या चित्रपटासाठी अभूतपूर्व तोंडी प्रसिद्धी निर्माण केली. प्रेक्षकांनी दाखवलेले हे प्रेम माझ्यासाठी प्रेरणादायी आहे.”

ब्रेकिंग : तुकाराम मुंढेंची थेट हायकोर्टावर कारवाई; कॅन्टीन बंद करण्याची दिली नोटीस

ते पुढे म्हणाले, “या चित्रपटासाठी कलाकार आणि तांत्रिक चमूने मनापासून मेहनत घेतली. प्रेक्षकांनी त्या मेहनतीला भरभरून प्रतिसाद दिला, याचा आनंद आहे. सुरुवातीला अपेक्षित ओपनिंग न मिळाल्यानंतरही वितरक आणि चित्रपटगृह मालकांनी आमच्यावर विश्वास ठेवला. त्यांच्या पाठिंब्यामुळेच हा चित्रपट इतका मोठा यशस्वी ठरू शकला.”

‘मैं वापस आऊंगा’ या चित्रपटात दिलजीत दोसांझ, नसीरुद्दीन शाह, शर्वरी आणि वेदांग रैना यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. प्रेम, भावना, आठवणी आणि नात्यांच्या गुंतागुंतीवर आधारित हा चित्रपट इम्तियाज अली यांच्या खास शैलीतील आणखी एक संस्मरणीय कलाकृती म्हणून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. बिर्ला स्टुडिओज, अप्लॉज एंटरटेनमेंट आणि विंडो सीट फिल्म्स यांच्या निर्मितीत साकारलेला हा चित्रपट सध्या आठव्या आठवड्यातही दमदार कामगिरी करत असून त्याचा यशस्वी प्रवास अद्याप सुरूच आहे.

Tags

follow us