नेपााळमध्ये राजकीय भूकंप, अवघ्या 26 दिवसांतच गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी दिला राजीनामा
Sudan Gurung Resigns : भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप आला असून नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी आहे.
Sudan Gurung Resigns : भारताच्या शेजारील राष्ट्र नेपाळमध्ये मोठा राजकीय भूकंप आला असून नेपाळचे गृहमंत्री सुदान गुरुंग यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या 26 दिवसांतच राजीनामा दिल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. व्यावसायिक दीपक भट्ट यांच्यासबोत व्यावसायिक भागीदारीवरुन गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर विरोधकांकडून जोरदार टीका होत होती. त्यामुळे त्यांनी या प्रकरणात राजीनामा दिला असल्याची माहिती समोर येत आहे. फेसबुक पोस्टद्वारे त्यांनी राजीनाम्याची माहिती दिली आहे.
मी, सुदान गुरुंग, चैत्र 13, 2082 (26 मार्च, 2026) पासून गृहमंत्री म्हणून माझी कर्तव्ये अत्यंत प्रामाणिकपणे पार पाडत आहे. अलीकडेच, माझ्याकडील शेअर्स आणि संबंधित बाबींविषयी नागरिकांनी उपस्थित केलेले प्रश्न, टिप्पण्या आणि सार्वजनिक चिंता मी अत्यंत गांभीर्याने घेतल्या आहेत. माझ्यासाठी, कोणत्याही पदापेक्षा नैतिक मूल्ये अधिक महत्त्वाची आहेत आणि जनतेच्या विश्वासापेक्षा मोठी कोणतीही शक्ती नाही.
आजची ‘Gen Z चळवळ‘ जी सुशासन, पारदर्शकता आणि उत्तरदायित्वाची मागणी करते नेमका हाच संदेश देते सार्वजनिक जीवन स्वच्छ असले पाहिजे आणि नेतृत्व हे उत्तरदायी असले पाहिजे. जेव्हा माझ्या 46 बंधू-भगिनींच्या रक्तावर आणि बलिदानावर उभारलेल्या सरकारवर प्रश्नचिन्ह निर्माण होते, तेव्हा त्याचे एकमेव उत्तर म्हणजे नैतिक सचोटी होय असं त्यांनी म्हटले आहे.
निष्पक्ष चौकशी होणार : सुदान गुरुंग
माझ्याशी संबंधित बाबींची निष्पक्ष चौकशी सुनिश्चित करण्यासाठी आणि पदावर असताना कोणत्याही प्रकारचा ‘हितसंबंधांचा संघर्ष’ टाळण्यासाठी, मी आजपासून लागू होईल अशा प्रकारे गृहमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. मी माझे नैतिक कर्तव्य पार पाडले आहे. आता, मी प्रसारमाध्यमांमधील माझ्या प्रिय मित्रांना, माझ्या सर्व नेपाळी बंधू-भगिनींना आणि तरुणांना आवाहन करतो: जर आपल्याला खरोखरच बदल हवा असेल, तर आपण सर्वांनी सत्य, प्रामाणिकपणा आणि आत्मशुद्धीच्या मार्गावरून चालले पाहिजे. काही प्रसारमाध्यम कर्मचाऱ्यांचे असलेले ‘स्वार्थी हेतू’ (vested interests) याविषयीची माहिती कालांतराने नक्कीच उघडकीस येईल. ज्यांना ‘रामराज्य’ प्रस्थापित करण्याची आकांक्षा आहे, त्यांच्याकडे त्याग करण्याची हिंमत आणि नैतिक बळ देखील असले पाहिजे असं देखील त्यांनी म्हटले आहे.
नेमकं प्रकरण काय?
दीपक भट्ट यांच्यावर मनी लाँडरिंगचे आरोप करण्यात आले आहे. दीपक भट्ट यांच्या कंपनीत गुरुंग यांचे नाव ४९ व्या क्रमांकावर आढळते, जे त्यांच्या २५ लाख रुपयांच्या गुंतवणुकीचे निदर्शक आहे. 2022 मध्ये परवाना मिळालेल्या या विमा कंपनीने अद्याप आपला ‘IPO’ जारी केलेला नाही. या कंपनीच्या गुंतवणूकदारांमध्ये भट्ट यांची ‘इन्फिनिटी होल्डिंग्स’, अग्रवाल यांची ‘जगदंबा होल्डिंग्स’ आणि ‘शंकर ग्रुप’ यांचा समावेश आहे. गुरुंग यांनी आपल्या अधिकृत मालमत्ता घोषणेमध्ये या शेअर्सची माहिती उघड केली नाही, असा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला आहे.