श्री सम्मेद शिखरजी ‘तीर्थक्षेत्र’च राहणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

श्री सम्मेद शिखरजी ‘तीर्थक्षेत्र’च राहणार, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली : झारखंडमधील पारसनाथ येथे असलेल्या जैन समाजाचे पवित्र तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी हे तीर्थक्षेत्र राहणार असून तीर्थक्षेत्र परिसरात बांधकाम, हॉटेल, ट्रेकिंग आणि मांसाहारावर बंदी घालण्यात आल्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे.

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, हे पवित्र स्थळ यापुढे पर्यटन क्षेत्र राहणार नाही. सर्व पर्यटन आणि इको-टूरिझम उपक्रमांवर बंदी घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी ट्विटरच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे.

तसेच तीर्थक्षेत्र परिसरात कोणतेही बांधकाम होणार नसून स्थळाचे पावित्र्य राखण्यासाठी हॉटेल, ट्रेकिंग आणि मांसाहारावर बंदी घालण्यात आली आहे. अशाप्रकारे केंद्र सरकारने तीन वर्षांपूर्वी दिलेला आदेश गुरुवारी मागे घेतला असल्याचं केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये म्हंटले आहे.

दरम्यान, ‘पर्यावरण-संवेदनशील क्षेत्र अधिसूचनेच्या कलम-3 मधील तरतुदींच्या अंमलबजावणीवर तात्काळ बंदी घालण्यात आली आहे, ज्यामध्ये इतर सर्व पर्यटन आणि इको-टूरिझम उपक्रमांचा समावेश असून याची खात्री करण्यासाठी राज्य सरकारला तातडीने सर्व आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश दिले भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने आज 5 जानेवारी रोजी जारी केलेल्या पत्राद्वारे दिले आहेत.

याबाबत केंद्र सरकारने देखरेख समिती स्थापन केली आहे. या समितीमध्ये जैन समाजातील दोन आणि स्थानिक आदिवासी गटातील एका सदस्याला स्थायी सदस्य म्हणून आमंत्रित करण्यास राज्य सरकारला सांगण्यात आले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube