मोठी बातमी! TET पेपर लीक प्रकरणात तिघांना अटक, परीक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदे लेट्सअप मराठीवर काय म्हणाल्या?
टीई़टी पेपर फुटल्याच्या बातमीनंतर लेट्सअप मराठीने परीक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदे यांच्याशी संवाद साधला.
शिक्षकांच्या टीईटी परीक्षेचा पेपर लीक झाल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. पेपर फुटल्याने उद्या 28 जून रोजी होणारी परीक्षा रद्द करण्यात आली असून पोलिसांनीही कारवाईला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. याप्रकरणातील टोळी विरोधात भिवंडीत कारवाई करण्यात आली असून तिघांना अटक केल्याची माहिती आहे.
कोनगाव पोलीस ठाणे हद्दीत लावलेल्या सापळ्यात तिघा जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. कोनगाव येथील डायमंड हॉटेलमध्ये पेपरफुटी संदर्भात संशयित असल्याच्या गुप्त माहितीनंतर कोनगाव पोलिसांचे पथक हॉटेलमध्ये दाखल झाले. मात्र, हे संशयित त्या ठिकाणी आढळून आले नाहीतय. त्यानंतर, पोलिसांच्या पथकाने सहारा एअरपोर्ट परिसरातून तिघांना ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांच्या प्राथमिक तपासातच ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडून टीईटी परीक्षेच्या पेपरचे प्रश्न आढळून आले आहेत. त्यानंतर, पोलिसांनी या तिन्ही आरोपींना भिवंडीत आणले असून याप्रकरणी भिवंडी कोनगाव पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद होत आहे. दरम्यान, आधी नीट आणि आता टीईटी पेपरफुटीच्या घटनेनंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त होत असून राजकीय नेत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत.
दरम्यान, नीटचा पेपर फुटला, मागील काही वर्षांत एमपीएससीचा पेपर फुटतो आणि आता टीईटीचा पेपर फुटला. भाजपने संविधान बदलण्यासाठी पक्ष फोडण्यापेक्षा, वारंवार होणारी पेपरफुटी थांबवण्यासाठी लक्ष द्यायला हवे होते. देशाच्या भवितव्याचे हाल करून ठेवले आहेत भाजपने, अशा शब्दात आदित्य ठाकरेंनी पेपरफुटीवर भाष्य केलं.
परीक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदे काय म्हणाल्या?
टीई़टी पेपर फुटल्याच्या बातमीनंतर लेट्सअप मराठीने परीक्षा परिषद उपायुक्त प्रिया शिंदे यांच्याशी संवाद केला असता त्या म्हणाल्या हा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. आता पेपर रद्द करण्यात आला असून हा पेपर पुन्हा घेतला जाईल. दरम्यान, हे अस का घडलं यावर बोलताना त्या म्हणाल्या पेपर देण्यासाठी डीएड झालेले विद्यार्थी आहेत आणि सेवेत असलेलेही लोक आहेत. सरकारी नौकरीचा प्रश्न असल्याने असं झालं असेल असं शिंदे म्हणाल्या आहेत. तसंच, परीक्षा परिषदेने कुठही हालगर्जीपणा केला नाही पण हे कसं घडलं याचा तपास होईल असंही त्या यावेळी म्हणाल्या.