रिफायनरी प्रकल्प! महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच, फडणवीसांची स्पष्टोक्ती

Untitled Design   2023 03 20T222710.040

Kokan Refinery Project: कोकण रिफायनरीवरून रत्नागिरीतील वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्याचबरोबर राजकीय वातावरण देखील चिघळण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. दरम्यान स्थानिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. रिफायनरी प्रकल्प कोकणातील (Refinery Project) नियोजित ठिकाणी होईल. महाराष्ट्रासाठी आम्ही प्रकल्प पूर्ण करणारच अशी स्पष्टोक्ती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली.

दरम्यान रत्नागिरीतील राजापूर तालुक्यातील बारसूमध्ये रिफायनरी प्रकल्प सुरू केला जाणार आहे. या प्रकल्पाच्या ठिकाणच्या मातीचे परीक्षण सुरू करण्यात आले आहे. या कामाला स्थानिकांकडून विरोध कला जातो आहे. अनेक ग्रामस्थांनी रिफायनरीविरोधात आंदोलन सुरू केले आहे. बारसूमध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर फडणवीसांनी मोठे विधान केले आहे.

फडणवीस म्हणाले, हा प्रकल्प आम्हाला प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. याच्या माध्यमातून आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या शंकांचे निरसन करू. तसेच बारसू गावात सध्या रिफायनरीच्या ठिकाणी बोअर मारले जात आहेत. ही जागा रिफायनरीसाठी योग्य असल्याचे अहवाल आल्यानंतर रिफायनरी उभी राहणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. हा प्रकल्प पर्यावरणपूरक असून निसर्गाला कोणताही धोका पोहचणार नसल्याचे त्यांनी म्हटले.

राज्याचा मोठा फायदा होणार
कोकणातील रिफायनरी प्रकल्पामुळे राज्याचा मोठा विकास होणार असल्याच्या भूमिकेचा पुनरुच्चार त्यांनी केला. या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा त्यांनी केला. या रिफायनरी प्रकल्पात असणाऱ्या तीन कंपन्यांनी वेगळ्या ठिकाणी प्रकल्प सुरू करण्याचे ठरवले होते. मात्र, आपण हा प्रकल्प अखंडितपणे राज्यात सुरू करण्याची विनंती केली होती. त्यानंतर आता हा प्रकल्प एकाच ठिकाणी कोकणात उभा राहत आहे.

सामान्यांना पुढे करून आंदोलनाचं राजकारण केलं जातंय
रिफायनरी विरोधातील आंदोलनात काही खरे आंदोलक असतील मात्र अनेक जण सुपारी घेतलेले दिसत असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला आहे. तसेच विरोधकांवर टीका करताना ते म्हणाले, राज्यात कोणताही प्रकल्प आला की, त्याला विरोध केला जातो. आरे कारशेडलाही विरोध करण्यात आला. सामान्य लोकांना पुढे करून आंदोलनाचे राजकारण केले जात आहे.

Tags

follow us