करोडोंचा चुराडा करणाऱ्या सरकारची हाव कमी होणार का ?; ‘त्या’ फर्मानावर तनपुरेंचा संताप

करोडोंचा चुराडा करणाऱ्या सरकारची हाव कमी होणार का ?; ‘त्या’ फर्मानावर तनपुरेंचा संताप

Prajkta Tanpure : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा सिल्वासा येथे रोड शो होणार आहे. यासाठी महाराष्ट्रातून तब्बल 700 बस सोडण्याचे फर्मान शिंदे फडणवीस सरकारने सोडले आहे. राज्य सरकारच्या या निर्णयावर विरोधी पक्षांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajkta Tanpure) यांनी तीव्र शब्दांत सरकारच्या या कारभाराचा निषेध केला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत. प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अशा परिस्थितीत लोकांचे हाल करून मोदींच्या रोड शो साठी बस पाठविण्याच्या निर्णयावर त्यांनी टीका केली आहे. या प्रकारावर तनपुरे यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट लिहीत संताप व्यक्त केला आहे.

या पोस्टमध्ये तनपुरे म्हणतात, ‘पंतप्रधान मोदी यांच्या सिल्वासा येथील भव्य रोड शो साठी महाराष्ट्रातून ७०० बसेस पाठविण्याचे आदेश वरून देण्यात आले आहे. वरून आलेल्या आदेशांना ओंजळीत झेलण्याची जणू शिंदे-फडणवीस सरकारला सवयच झाली आहे. महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांना पोहोचणारी लालपरी, लाखो लोकांना दररोज त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचविते. आजपासून तब्बल ७०० बसेसची कमतरता निर्माण झाल्यामुळे लोकांचे हाल झाले आहेत.’

‘बसस्थानकावर लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंजिनिअरिंग आणि इतर काही पदवी शिक्षणाच्या परीक्षा अद्याप सुरू आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यात सुट्टीत मामाच्या गावाला जाणाऱ्या लहानग्यांच्या हिरमोड झाला आहे.’

‘प्रत्येक सोहळे ग्रँड करायचे, करोडो रुपयांचा चुराडा करायचा, लोकांना पैसे देऊन गर्दी जमवायची… यांची प्रसिद्धीची हाव कमी होणार तरी कधी? नुकतंच खारघर येथे अव्यवस्थेमुळे निष्पाप लोकांचा बळी गेला. याचे तरी भान ठेवायला हवे होते. वाक म्हटले की वाकायचे ही महाराष्ट्राची परंपरा नाही याची जाणीव राज्य सरकारने ठेवावी.’ अशा शब्दांत तनपुरे यांनी राज्य सरकारला फटकारले आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube