दु:खद! अंबाजोगाई येथील भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचं निधन
डॉ. अभिमन्यू तरकसे हे नित्यनेमाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत.
बीड जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडली आहे. (Beed) अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे (स्वराती) भूलशास्त्र (एनॅस्थेशिया) विभागाचे प्रमुख डॉ. अभिमन्यू तरकसे यांचा मंगळवारी (19 मे 2026) सकाळी काळवीट साठवण तलावात पोहोताना बुडून मृत्यू झाला. सकाळी साडे सहा वाजेच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली. या घटनेमुळे अंबाजोगाई शहरासह वैद्यकीय क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. अभिमन्यू तरकसे हे प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. मंगळवारी सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहोण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला बिसलरीची रिकामी बाटलीही बांधली होती. काही वेळानंतर तलावातील सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगताना पोहोणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास आला.
बीडच्या आष्टीत बांधकाम विभागाचा तुघलकी कारभार; अतिक्रमण सांगून 21 गाळे पाडले, मेहबुब शेख आक्रमक
मूळचे अंबाजोगाईजवळील धावडी गावचे रहिवासी असलेल्या डॉ. अभिमन्यू तरकसे यांचे प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत झाले होते. या बिकट परिस्थितीवर मात करत त्यांनी शालांत व उच्च माध्यमिक परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवले. त्यानंतर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातूनच त्यांनी वैद्यकीय पदवी (MBBS) घेतली. पुढे याच महाविद्यालत त्यांनी भूलशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. याच संस्थेत ज्युनिअर रेसिडेंट म्हणून रुजू झालेले डॉ. तरकसे आपल्या कौशल्याच्या जोरावर पुढे याच विभागाचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.
घटनेची माहिती वाऱ्यासारखी पसरताच स्वराती वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मित्रांनी आणि प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणला. डॉ. तरकसे यांना पोहोताना हृदयविकाराचा झटका आला की अन्य काही घडले, याचा खुलासा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. एका अत्यंत मनमिळाऊ आणि हुशार तज्ज्ञ डॉक्टरांच्या अकाली जाण्याने अंबाजोगाई शहरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.