Ajit Pawar : ‘तुम पे ॲक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी?…’ दादांचा व्हिडीओ जाणूनबुजून व्हायरल; राष्ट्रवादी नेत्यांकडून पाठराखण

Ajit Pawar : ‘तुम पे ॲक्शन लुंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी?…’ दादांचा व्हिडीओ जाणूनबुजून व्हायरल; राष्ट्रवादी नेत्यांकडून पाठराखण

NCP Leader Support Ajit Pawar : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका महिला पोलीस अधिकाऱ्याशी फोनवर बोलताना दमदाटी केल्याचा व्हिडिओ सध्या राज्यभरात चर्चेत आहे. महिला पोलीस उपअधीक्षक अंजना कृष्णा यांच्यासोबतचा हा व्हिडिओ कॉल माध्यमांत झळकल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला. या घटनेनंतर सोलापुरातील कुर्डू गावातील 15 ते 20 ग्रामस्थ आणि फोन लावणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी हा व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल केल्याचा आरोप करत अजित पवारांचा बचाव केला आहे. दादांनी शेतकरीविरोधी कारवाई थांबवण्यासाठीच आदेश दिले होते, असं राष्ट्रवादीच्या नेत्यांचं म्हणणं आहे.

काय आहे प्रकरण?

सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डू गावात (Ajit Pawar) रस्त्याच्या कामासाठी मुरुम उत्खनन सुरू होतं. त्याविरोधात तक्रार आल्यानंतर करमाळ्याच्या उपविभागीय पोलीस अधिकारी IPS अंजना कृष्णा घटनास्थळी पोहोचल्या. गावकऱ्यांशी आणि अंजना कृष्णा (IPS Anjana Krishna)यांच्यात मुरुम उपशाच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला. या वादाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते बाबा जगताप यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि तो अंजना कृष्णा यांच्या हातात दिला.

मात्र, त्या अजित पवारांचा आवाज ओळखू शकल्या नाहीत. त्यावेळी पवार दोनदा सांगताना दिसले की, डेप्युटी सीएम अजित पवार बोल रहा हूं… कार्यवाही बंद करो, मेरा आदेश है. त्यावर अंजना कृष्णा यांनी पवारांना स्वतः कॉल करण्यास सांगितलं. त्यानंतर अजित पवारांनी व्हिडीओ कॉल करून त्यांच्याशी अधिक थेट संवाद साधला. या संभाषणात पवार कार्यवाही थांबवण्याचे आदेश देत असल्याचे दिसून आलं. तसेच त्यांनी कठोर शब्दांत, “तुम पे अॅक्शन लूंगा, इतनी डेरिंग है तुम्हारी? मेरा चेहरा तो पहचानोगे ना? असेही म्हटल्याचं व्हिडीओत स्पष्ट ऐकू येतं.

राजकीय वर्तुळातील चर्चा आणि बचाव

या प्रकरणावरून अजित पवार विरोधकांच्या निशाण्यावर आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्यावतीने बचाव करताना दिसले. सुनील तटकरे यांनी म्हटलं की, अजित पवार रोखठोक बोलतात, जनतेला न्याय मिळवून देणं हीच त्यांची खासियत आहे. गैरवाजवी प्रकरणांमध्ये ते कधीच हस्तक्षेप करत नाहीत. त्या दिवशी त्यांनी कारवाई थांबवा असं सांगितल्याचं मी ऐकलं नाही.”

तर आनंद परांजपे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, डीवायएसपी दर्जाची महिला अधिकारी राज्याचे उपमुख्यमंत्री ओळखत नसेल तर हे चुकीचं आहे. संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे की अजित पवार स्पष्ट बोलतात, योग्य निर्णय घेतात. शेतकऱ्यांची बाजूही ऐकली पाहिजे, तोपर्यंत कारवाई थांबवावी, असा त्यांचा हेतू होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube