दमबाजीची भाषा करणाऱ्यांना जशास तसे उत्तर द्या, मी तुमच्या पाठीशी : सुजय विखे

दमबाजीची भाषा करणाऱ्यांना जशास तसे उत्तर द्या, मी तुमच्या पाठीशी : सुजय विखे

अहमदनगर : विधानसभा निवडणूका जिंकायच्‍या असतील तर सर्वांना मोठे मन ठेवावे लागेल. राज्‍यात पुन्‍हा महायुतीचे सरकार आणण्‍यासाठी प्रत्‍येक आमदार महत्त्वाचे आहेत. लोकसभा निवडणूकीत केवळ अपप्रचार झाला. मागील पाच वर्षात केलेला विकास अवघ्‍या दोन महिन्‍यात कुठे वाहून गेला हेही समजलं नाही. सत्ता आली तरच कार्यकर्ते जिवंत राहतील यासाठी आपले लोकप्रतिनिधी महत्‍वाचे आहेत. महायुती सरकार आले तरच सामान्‍य माणसाला न्‍याय मिळेल, विकासाची कामे मार्गी लागतील, कोण काय भाषणबाजी करतयं याला माझ्या दृष्‍टीने महत्‍व नाही, मात्र कार्यकर्त्‍यांना दमबाजीची भाषा झालीच तर जशास तसे उत्तर देण्‍यास मागेपुढे पाहू नका. तुमच्‍या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, असे म्हणत खासदार सुजय विखे यांनी कार्यकर्त्‍यांना आश्‍वासित केले.

विधानसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्‍यावतीने जिल्‍ह्यातील पदाधिकारी, बुथप्रमुख, शक्‍तीकेंद्र प्रमुख यांची एकत्रित बैठक राहुरी येथे संपन्‍न झाली. या बैठकीला प्रदेश महामंत्री विजयराव चौधरी, संघटनमंत्री रवी अनासपुरे, जिल्‍हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, आ.मोनिका राजळे, वैभव पिचड, भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष विठ्ठलराव लंघे, दिलीप भालसिंग, शहर जिल्‍हाध्‍यक्ष अॅड.अभय आगरकर, महिला जिल्‍हाध्‍यक्षा अर्चना थोरात, कांचन मांढरे, जेष्‍ठ नेते सुभाष पाटील, नानासाहेब पवार, नितीन दिनकर, अरुण मुंढे, सत्‍यजीत कदम, बाबासाहेब वाकळे, भैय्या गंधे आदी उपस्थित होते.

निवडणुकीनंतर रस्त्यावरची लढाई; आंदोलनांतून लंकेंनी शोधला मंत्री विखेंच्या कोंडीचा नवा मार्ग

तसेच यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपल्‍या भाषणात म्‍हटले की, लोकसभेत पराभव स्वीकारावा लागला असला तरी देशाच्या पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले. याचा सर्वांना अभिमान आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने केलेल्‍या नकारात्‍मक प्रचाराला उत्तर देण्‍यास कमी पडलो. ही चुक पुन्‍हा होऊ द्यायची नसेल तर केंद्र आणि राज्‍य सरकारच्‍या योजना प्रभावीपणे प्रत्‍येक गावामध्‍ये पोहोचवा. सोशल मिडीयावर कोण काय चर्चा करतं यापेक्षा या योजनांचीच माहीती लोकांपर्यंत पोहोचविली तर, विरोधकांच्‍या नकारात्‍मक प्रचाराला ते प्रभावी उत्तर ठरू शकेल असे ना. विखे पाटील यांनी ठणकावून सांगितले.

थोरातांना शाब्दिक टोला

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या दहा वर्षांच्‍या कार्यकाळात या राज्‍यासाठी विविध प्रकारची मदत झाली. सहकारी साखर कारखान्‍यांचा आयकराचा बोजा मोदी सरकारमुळे कमी झाला. इथेनॉल निर्मितीला प्रोत्‍साहनही केंद्र सरकारमुळे मिळाले. मात्र दहा वर्षे केंद्रात कृषिमंत्री राहूनही या राज्‍याच्‍या हिताचे एकही काम महाविकास आघाडीच्‍या नेत्‍यांना करता आले नाही. नुकत्‍याच सादर झालेल्‍या केंद्र सरकारच्‍या अर्थसंकल्‍पातही युवक, महिला, आदिवासी यांच्‍याकरीता मोठ्या निधीची तरतूद करुन, सर्वच समाजघटकांना न्‍याय देण्‍याची भूमिका घेतली गेली असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

लोकसभा निवडणुकामधील चुकांची पुनरावृत्ती टाळा; विखेंनी कार्यकर्त्यांना ठणकावले

मविआचा ढोंगीपणा उघड करा

राज्‍यातील महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजनेपासून ते शेतकऱ्यांना मोफत वीज देण्‍यापर्यंत योजना जाहीर केल्‍या आहेत. कौशल्‍य विकासातून युवकांनाही रोजगाराच्‍या संधी निर्माण करुन दिल्‍या आहेत. महायुती सरकारमुळेच जिल्‍ह्याच्‍या विकासाला गती मिळत असून तीन औद्योगिक वसाहती सुरू होण्‍याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. आपले हित कशात आहे, हे मतदारांना समजावून सांगण्‍याची जबाबदारी आता पदाधिकारी आणि कार्यकर्त्‍यांची आहे. महाविकास आघाडीचा ढोंगीपणा उघड करण्‍याची हीच संधी असल्‍याची त्‍यांनी सांगितले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube