मोर्चा काढला, आता दोन दिवसात मोठा बॉम्ब फोडणार; जलील यांचा मंत्री शिरसाटांना इशारा

Imtiaz Jaleel On Sanjay Shirsat : गेल्या काही दिवसांपासून एआयएमआयएमचे (AIMIM) माजी खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) राज्याचे मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्यावर अनेक गंभीर आरोप करत आहे. या आरोपांमुळे दोघांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहे. आज इम्तियाज जलील यांनी आंबेडकरी जनतेचा अपमान केला असून त्यांना अटक करण्यात यावी या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मोर्चा काढण्यात आला होता. तर माजी खासदार इम्तियाज जलील यांनी या मोर्चावर प्रतिक्रिया देत पुढील दोन दिवसात मोठा बॉम्ब फोडणार असल्याचा इशारा मंत्री शिरसाट यांना दिला आहे. त्यामुळे इम्तियाज जलील कोणता नवीन खुलासा करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
माध्यमांशी बोलताना इम्तियाज जलील म्हणाले की, पैसे आणून गोरगरिब समाजातील लोकांना वेठीस धरण्याचा हा प्रकार होता. माझ्या अटकेची मागणी करणारे, इम्तियाज जलील मुर्दाबाद म्हणणारे स्टेजवरचे नेते जर शिक्षित असे तर त्यांना अटकेची प्रक्रिया माहिती असती. पण गोरगरिबांच्या योजनांचे पैसे खायचे, कोट्यावधीच्या योजना लाटायच्या यावर ज्यांचे घर चालते त्यांना याची अक्कल कुठे असणार? असं माध्यमांशी बोलताना माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले.
माध्यमांशी पुढे बोलताना जलील म्हणाले की, उद्या मी, या मोर्चापेक्षा दहापट मोठा मोर्चा काढून मला अटक करु नका म्हटलो तर चालणार का? मंत्री शिरसाट यांचा सगळा अटापिटा हा मानहानी झाली म्हणून नाही तर ‘मनी’ ची हानी झाली म्हणून आहे. समाज कल्याण विभागाच्या सात कोटींच्या योजना, रमाई घरकुल योजनेच्या फायलीतून आपल्याच समाजाच्या लोकांना धोका देणाऱ्यांना गोरगरिबांच्या हिताशी काही देणेघेणे असते पण गोरगरिबांच्या योजनांचे पैसे खायचे, कोट्यावधीच्या योजना लाटायच्या यावरच ज्यांचे घर चालते त्यांना याची अक्कल कुठे असणार? असं देखील माजी खासदार जलील म्हणाले.
तुम्ही माझ्या विरोधात मोर्चा काढला, आता बघा मी तुमची कशी वाट लावतो, आतापर्यंत मी लवंगी फटाके फोडत होतो, दोन दिवसांनी मोठा बाॅम्ब फोडणार आहे, असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.
मोठी बातमी, काँग्रेस प्रदेशाध्यक्षाचा राजीनामा; अनेक चर्चांना उधाण
नेमकं प्रकरण काय?
मंत्री शिरसाट यांच्यावर आरोप करताना पत्रकार परिषदेमध्ये जलील यांनी ‘हरिजन’ शब्दाचा उल्लेख केला होता मात्र त्यांनी या शब्दाचा वारंवार उल्लेख करत आंबेडकरी समाजाचा अपमान केला असा आरोप करत शहरातील विविध पोलीस ठाण्यात ॲट्राॅसिटीची गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहे. याच मागणीसाठी आज शहरातील क्रांती चौक ते भडकलगेटपर्यंत मोर्चा काढण्यात आला होता.