‘रमी’रावांची उचलबांगडी! कोकाटेंना क्रीडा मंत्रालय दिलं, रोहित पवारांनी टोचले फडणवीस सरकारचे कान

Rohit Pawar Warning To Mahayuti Government : राज्यातील राजकारणात पुन्हा एकदा खळबळजनक घडामोडी समोर आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात (Mahayuti Government) फेरबदल करण्यात आलाय. माणिकराव कोकाटे यांच्याकडून कृषी खातं (Agriculture Minister Post) काढून घेण्यात आलं आहे. त्यांच्या जागी दत्तात्रय भरणे यांच्याकडे कृषी मंत्रालय देण्यात आलं असून, कोकाटे यांना ( Manikrao Kokate) आता क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाचा कार्यभार देण्यात आला आहे.
अंबानी ईडीच्या रडारवर! समन्स बजावले, 5 ऑगस्टला चौकशी होणार
कृषिमंत्रीपदाचा राजीनामा
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एका व्हिडीओमुळे वाद निर्माण झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी विधिमंडळात रमी खेळत असलेला माणिकराव कोकाटे यांचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर शेअर केला होता. या व्हिडीओनंतर विरोधकांनी कोकाटे यांच्यावर टीकेचा भडिमार करत कृषिमंत्रीपदाचा राजीनामा मागितला होता. या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी थेट महायुती सरकारला इशारा दिला आहे.
कोणतेही मंत्रीपद ही मोठी जबाबदारी असते आणि त्या पदावरील व्यक्ती जबाबदारीने न वागल्यास त्या पदाला न्याय न देऊ शकल्यास सर्वसामान्यांना त्याचा फटका बसतो. तसंच काहीसं कोकाटे साहेबांच्या बाबतीत झालं होतं आणि त्याचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसत होता, म्हणूनच त्यांच्या राजीनाम्याची…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) August 1, 2025
एक्स (Twitter) वर पोस्ट करत रोहित पवार यांनी म्हटलंय की, कोणतेही मंत्रीपद ही फक्त प्रतिष्ठा नसून मोठी जबाबदारी असते. जेव्हा मंत्री स्वतःच्या पदाच्या जबाबदारीकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा त्याचा फटका थेट सामान्य जनतेला बसतो. कोकाटे यांच्या बाबतीतही असंच घडलं. त्यामुळेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. सरकारने राजीनाम्याऐवजी केवळ खात्याचा फेरबदल केला. मात्र, क्रीडा मंत्रालयसुद्धा युवकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे कोकाटे यांनी आता तरी भूतकाळातील चुका न करता जबाबदारीने काम करावं, ही अपेक्षा आहे. तसेच दत्तात्रय भरणे यांनी कृषी खात्याचा कार्यभार स्वीकारताना शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य द्यावं.
फक्त खाते बदलले
रोहित पवार यांनी स्पष्ट शब्दांत म्हटलंय की, फक्त खाते बदलल्याने जबाबदारीपासून सुटका होत नाही. सरकारमधील प्रत्येक मंत्री जबाबदारीने वागला पाहिजे. अन्यथा संपूर्ण सरकार त्यासाठी जबाबदार ठरेल. आम्ही आमच्या लक्षातून कोणतंही खाते सुटू देणार नाही. मंत्री असंवेदनशील असतील, तर महाराष्ट्र सहन करणार नाही.
माणिकराव कोकाटेंना क्रीडा मंत्रालय दिल्यानंतर शरद पवार गटाने खोचक प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यांच्या अधिकृत एक्स (Twitter) अकाऊंटवर पोस्ट करत लिहिलं आहे,
महाराष्ट्रातील गरीब, कष्टकरी, शेतकरी व तरुण वर्गाच्या प्रश्नांना न्याय मिळो अथवा न मिळो, मात्र महायुतीतील मंत्र्यांच्या कला-गुणांना नक्कीच चालना मिळते, हे पुन्हा सिद्ध झालं आहे. ‘रमी’राव यांचं मनःपूर्वक अभिनंदन! त्यांनी माणिकराव कोकाटेंना ‘रमी’ खेळावरून पुन्हा एकदा टोला लगावण्यात आला आहे.