यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेची वाईल्ड कार्ड एंट्री, पंचांशी गैरवर्तन प्रकरणी घातलेली बंदी उठवली
महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पैलवान शिवराज राक्षे यांच्यावर घालण्यात आलेली तीन वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे.
Shivraj Rakshe’s wild card entry in Maharashtra Kesari competition : राज्यातील कुस्ती क्षेत्रात चर्चेचा विषय ठरलेल्या एका महत्वाच्या निर्णयात रेसलिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने पैलवान शिवराज राक्षे यांच्यावर घालण्यात आलेली तीन वर्षांची बंदी उठवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे त्याला पुन्हा राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कुस्तीगीर संघाच्या या निर्णयामुळे राज्यातील कुस्ती वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार शिवराज राक्षे हा खेड तालुक्यातील राक्षेवाडी येथील रहिवासी असून राज्यातील उत्तम कुस्तीपटूनमध्ये त्याचा समावेश होतो. मात्र मागील वर्षी अहिल्यानगर येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेदरम्यान घडलेल्या गैरवर्तनाच्या प्रकारामुळे त्याच्यावर महाराष्ट्र कुस्तीगीर संघाकडून 3 वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्या घटनेनंतर त्याला राज्यातील अधिकृत स्पर्धांपासून दूर राहावे लागले होते. दरम्यान, या प्रकरणात राक्षे याने संघाकडे लेखी स्वरूपात दिलगिरी व्यक्त केली होती. भविष्यात अशा प्रकारची चूक पुन्हा होणार नाही, तसेच खेळाच्या शिस्तीचे पालन करू, अशी हमी त्याने दिली होती. या पार्श्वभूमीवर संघाने या प्रकरणाचा पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला.
2 मार्च 2026 रोजी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत या विषयावर चर्चा करण्यात आली. संघाचे अध्यक्ष रामदास तडस तसेच पदाधिकाऱ्यांना या प्रकरणावर अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार देण्यात आला होता. त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर खेळाडूंच्या हिताचा विचार करून आणि भविष्यत त्याची कारकीर्द बाधित होऊ नये या उद्देशाने शिवराज राक्षे यांच्यावरील बंदी उठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संघाकडून स्पष्ट करण्यात आले. या निर्णयामुळे राक्षे याला आगामी महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता मिळणार सोबत, काही महिलांना मिळणार नाही लाभ
विशेष म्हणजे 18 ते 22 मार्च 2026 या कालावधीत होणाऱ्या वरिष्ठ गट राज्यस्तरीय गादी आणि माती अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांमध्ये तसेच प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी किताबासाठी होणाऱ्या स्पर्धेत त्याला वाईल्ड कार्डद्वारे सहभागाची परवानगी देण्यात आली आहे. कुस्तीगीर संघाने स्पष्ट केले आहे की, खेळाडूंच्या भविष्याचा विचार करून आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील कुस्ती संस्कृती टिकवून ठेवणे आणि नवोदित तसेच प्रतिभावान खेळाडूंना संधी मिळणे हे संघाचे उद्दिष्ट असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या संदर्भातील अधिकृत पत्र महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे सचिव योगेश दोडके यांनी जारी केले आहे. या पत्रात राक्षे याच्यावरील बंदी उठवून त्याला आगामी स्पर्धांमध्ये सहभागी होण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे राज्यातील कुस्ती क्षेत्रात विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काही जणांनी खेळाडूंना सुधारण्याची संधी देणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले आहे, तर काहींनी शिस्तभंगाच्या प्रकरणांवर कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे सांगितले आहे.
तथापि, बंदी उठवल्यानंतर आता शिवराज राक्षे याची कामगिरी कशी राहते आणि तो पुन्हा एकदा राज्यातील कुस्ती मैदानात आपली छाप उमटवतो का, याकडे राज्यातील कुस्तीप्रेमींचे लक्ष लागले आहे. आगामी राज्य अजिंक्यपद स्पर्धा आणि महाराष्ट्र केसरी किताबाच्या लढतीत ते कशी कामगिरी करतात, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
