शिंदे सरकारविरोधात ‘राणेंची’ तलवार म्यान : 24 तासांमध्येच टीकेवरुन थेट विनंतीची भाषा

शिंदे सरकारविरोधात ‘राणेंची’ तलवार म्यान : 24 तासांमध्येच टीकेवरुन थेट विनंतीची भाषा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Chhtrapati Shivaji Maharaj) यांच्या महाराष्‍ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्‍या मराठा समाजाचे (Maratha Community) खच्‍चीकरण होणार नाही याची काळजी घ्‍यावी. स्‍वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्‍याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे. या सगळया नाजूक प्रश्‍नाचा महाराष्‍ट्र सरकारने सखोल विचार करावा, असे म्हणत केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी महाराष्ट्र सरकारला सगेसोयरे अधिसुचनेचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. (Union Minister Narayan Rane has requested the Maharashtra government to reconsider the Sagesoyre notification)

मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी जालना ते मुंबई अशी पदयात्रा काढली. नवी मुंबईतील वाशीपर्यंत आल्यानंतर शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने अधिसूचना काढली. यात ‘सगेसोयरे’ या शब्दावर खलबते होऊन ज्यांची नोंद नाही अशा मराठा समाजातील नातेवाईकांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येण्याची तरतूद केली. मात्र याच तरतुदीवर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी काल आक्षेप घेतला होता. यावरुन त्यांनी शिंदे सरकावर टीका करत पत्रकार परिषद घेण्याची घोषणा केली होती.

मराठा आरक्षणावर नाराज झालेल्या छगन भुजबळांची सरकार समजूत काढणार…

नारायण राणे म्हणाले होते, मराठा समाज आरक्षणासंबंधी राज्‍य सरकारने घेतलेल्‍या निर्णयाशी आणि दिलेल्‍या आश्‍वासनाशी मी सहमत नाही. यामध्‍ये ऐतिहासिक परंपरा असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण आणि इतर मागास समाजावर अतिक्रमण होणार असल्‍याने राज्यात असंतोष निर्माण होऊ शकतो. उद्या सोमवार दि. 29 जानेवारी रोजी मी यावर पत्रकार परिषद घेऊन सविस्‍तर बोलेन, असेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे पत्रकार परिषद घेणार असल्याची घोषणाही केली.

राणेंची तलवार म्यान :

मात्र आता राणे यांनी ही पत्रकार परिषद रद्द झाल्याची माहिती देत महाराष्ट्र सरकारला या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, या विषयावर मला महाराष्‍ट्र शासनाला विनंती करावयाची आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या महाराष्‍ट्रात लढवय्येपणाचा वारसा आणि इतिहास असलेल्‍या मराठा समाजाचे खच्‍चीकरण होणार नाही याची काळजी घ्‍यावी.

स्‍वाभिमानी मराठा कुणबी समाजामध्‍ये समाविष्‍ट होऊन आरक्षण घेणार नाही. याशिवाय तसे केल्‍याने इतर मागास वर्ग (ओबीसी) समाजावर अतिक्रमण होणार आहे. या सगळया नाजूक प्रश्‍नाचा महाराष्‍ट्र सरकारने सखोल विचार करावा. महाराष्‍ट्रामध्‍ये मराठा समाजाची संख्‍या 32 टक्‍के म्‍हणजे 4 कोटी एवढी आहे. कोणत्‍याही पदापेक्षा जात, धर्म आणि देश महत्‍वाचे आहेत एवढंच मला सांगावेसे वाटते, असेही ते म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube