“पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा, ठाकरेंचंही बरोबरच”; शरद पवार रोखठोक बोलले

“पाचवीपर्यंत हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा, ठाकरेंचंही बरोबरच”; शरद पवार रोखठोक बोलले

Sharad Pawar on Hindi Language Dispute : राज्यात सध्या हिंदी भाषेला विरोध (Hindi Language Dispute) वाढू लागला आहे. या मुद्द्यावर राजकारणाची धार वाढली आहे. हिंदी सक्ती नकोच असा विरोधकांचा सूर आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी (Uddhav Thackeray) वेगवेगळ्या मोर्चांची घोषणा केली आहे. या सगळ्या घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाष्य केलं आहे. ठाकरेंचं वक्तव्य चुकीचं नाही असे शरद पवार म्हणाल आहेत. सातारा येथे आज त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील हिंदी भाषेच्या मुद्द्यावर स्पष्ट मत व्यक्त केलं.

माळेगाव कारखान्याचे कारभारी अजितदादा! 21 पैकी 20 जागा जिंकल्या, शरद पवारांच्या पॅनलचा सुपडा साफ

हिंदी भाषा सक्तीला विरोध वाढतोय. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या दोघांनीही विरोध केला असून मोर्चांची घोषणा केली आहे असे विचारले असता पवार म्हणाले, मला वाटतं या सगळ्यांचा आग्रह असा आहे की प्राथमिक शिक्षणात हिंदी सक्तीची करू नये. पाचवीच्या नंतर हिंदी शिकायला काही हरकत नाही. देशातला एक मोठा वर्ग हिंदी भाषा बोलतो. त्यामुळे हिंदीला एकदम त्याज्य समजण्याचं कारण नाही.

हिंदी भाषेचा हट्ट सरकारने सोडावा

हे जरी असलं तरी मुलांच्या एका विशिष्ट वयात तो भाषा किती आत्मसात करू शकेल. त्याच्यावर किती भाषांचा लोड टाकावा लागेल याचा विचार करावा लागेल. तो लोड टाकला आणि जर मातृभाषा बाजूला पडली तर ते योग्य नाही. म्हणून पाचवीपर्यंत हिंदी भाषा संबंधीचा हट्ट सरकारने सोडावा. या ठिकाणी मातृभाषा हीच महत्वाची असली पाहिजे. त्यानंतर पाचवीच्या नंतर पुढं जे काही करायचं असेल त्याचा निर्णय कुटुंबातले लोक घेतील त्याला आमचा विरोध नाही.

आता ठाकरे बंधू (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) जे काही बोलत आहेत त्यांचं वक्तव्य मी आता पाहिलं ते काही चुकीचं नाही. या निमित्ताने महाराष्ट्रातले मराठी भाषिक एकत्र येत असतील भूमिका घेत असतील तर ते मातृभाषेच्या दृष्टीने चांगली गोष्ट आहे. पण, मोर्चाबाबतीत कुणीही एक राजकीय पक्ष सामूहिक भूमिका घेऊ शकत नाही. ते म्हणालेत आम्ही अन्य पक्षांशी बोलणार आहोत. त्यांनी आधी बोलू द्या नंतर चर्चा करू पण याबाबतीत आमची दृष्टीकोन नकारात्मक नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Video : राज ठाकरेंनी हिंदी सक्तीविरोधात दंड थोपटले; 6 जुलैचा मुहूर्त निवडत सरकारला दाखवणार ताकद

ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव नाराज असल्याच्या चर्चा सुरू आहेत यावर शरद पवार म्हणाले, भास्कर जाधव मला जवळून माहिती आहेत. त्यांच्या विचारात स्पष्टता आहे. एखाद्या गोष्टीवरुन नाराजी असते आहे की नाही मला माहिती नाही. पण विधीमंडळात भास्कर जाधव यांचं योगदान उत्तम आहे. प्रभावी विरोधी पक्ष म्हणून उत्तम काम करतात. एखाद्या गोष्टीवर ते रागावले असतील पण तत्व ते कधीच सोडणार नाहीत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube