नामांतराला विखेंचा ‘नो’, पडळकरांना सुनावले

नामांतराला विखेंचा ‘नो’, पडळकरांना सुनावले

अहमदनगर : जिल्ह्याचा नामांतराचा विषय पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जिल्ह्याचे नामांतर व्हावे अशी मागणी जिल्ह्याबाहेरील काही नेते मंडळी करू लागले आहे. आता याच नामांतराच्या विषयावरून राज्याचे महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी आपले मत मांडले आहे.

यावेळी बोलताना विखे म्हणाले, नामांतराचा अंतिम निर्णय अद्याप झालेला नाहीये. औरंगाबादला संभाजीनगर करा अशा चर्चा आजवर आपण ऐकल्या असतील. मात्र नामविस्तार करण्यापेक्षा जिल्ह्याच्या विकासाकडे लक्ष केंद्रीत केले पाहिजे. आपण जिल्हा विभाजनाच्या विषयावर विनाकारण चर्चा करतोय. राज्यात असे अनेक मोठे जिल्हे आहे.

मात्र जिल्हा विभाजन करून आपण काय साध्य करतोय. पालघर जिल्हा वेगळा झाला मात्र ठाणे भौगोलिक दृष्ट्या मोठा जिल्हा आहे. मात्र अशी परिस्थिती नगरमध्ये नाहीये. आम्ही जिल्ह्याचा विकासाचा आराखडा तयार करतोय त्यानुसार तरुणांचा रोजगार मिळवा, त्यांचे भविष्य घडवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे.

पुढे बोलताना विखे म्हणाले, बाहेरच्या लोकांनी येऊन या विषयवार भाष्य करण्यापेक्षा जिल्ह्यातील लोकांच्या काय भावना आहेत हे जाणून घेणे गरजेचे आहे. नामांतर किंवा जिल्हा विभाजन या मुद्द्यांवरून मत भिन्नता निर्माण होते. आज जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने एकत्र येऊन चर्चा करायला हवी असेही विखे म्हणाले.

विभाजन आणि नामांतर या विषयाला विनाकारण मुद्दा करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. या गोष्टीला माझे समर्थन नाही. याप्रकरणी गोपीचंद पडळकरांना समज देण्याची गरज नाही. ते माझे मित्र आहेत म्हणून मी स्वतः त्यांना भेटून याबाबत चर्चा करेन.

नामांतराबाबत पडळकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. मात्र त्याचे पडसाद म्हणून विनाकारण या विषयांना वेगळे वळण लागते. तसेच काहीजण याचे राजकीय भांडवल करतात. पक्षांतर्गत आम्ही या विषयवार चर्चा करू असे यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube