Mumbai Rain : उकाड्यातून दिलासा! मुंबईत पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यासह ‘मुसळ’धार

मुंबईत मान्सून दाखल झाला असून मुंबईसह, पालघरमध्ये पुढील तीन तासांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलायं.

Mumbai Rain

Mumbai Rain : अखेर राज्यात मान्सून दाखल झाला असून मंगळवारी मुंबईत जोरदार पावसाची (Mumbai Rain) एन्ट्री झालीयं. मुंबईत झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असून मान्सून दाखल होताच मुंबईसह पालघर जिल्ह्यासाठी हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुढील 3 तासांत मुंबई आणि पालघर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलीयं. यादरम्यान, ताशी 40 ते 60 किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचंही आवाहन हवामान विभागाने केलंय. दरवर्षी मुंबईत मान्सून दाखल होण्याची अधिकृत तारीख ही 10 ते 11 जून असते. यंदा मात्र, मान्सून 12 दिवसांनी उशिरा पोहोचला आहे.

गेल्या वर्षी म्हणजेच २०२३ मध्येही मान्सून असाच रेंगाळला होता आणि तो २३ ते २५ जून दरम्यान मुंबईत आला होता. मुंबईच्या इतिहासात मान्सूनला सर्वाधिक विलंब १९५८ आणि १९७४ मध्ये झाला होता, जेव्हा मान्सून थेट २८ जून रोजी दाखल झाला होता. दरम्यान, मंगळवारी मुंबईतील नायर रुग्णालय, एम. जोशी मार्ग परळ, मालाड, मानखुर्दमध्ये जोरदार पावसाची एन्ट्री झालीयं.

काल झालेल्या पावसामुळे भिवंडीच्या ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडीत झाला असून कुर्ला रेल्वेमार्गावर पाणी साचलं आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूकही उशिराने सुरु झाली असून दादर रेल्वे स्थानकात पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे.

दरम्यान, महाराष्ट्राला ज्याची प्रतिक्षा होती ते क्षण आता आले आहेत. राज्यात अखेर मान्सूनचे आगमन झाले आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये मान्सून पावसाच्या सरी बरसल्या आहेत. राज्यात सर्वदूर मान्सून पोहोचला आहे. आगामी सात ते आठ दिवसांमध्ये राज्यातील वेगवेगळ्या भागांमध्ये मान्सून जोरदार बरसणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे

follow us