Thane Hospital News : ‘शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव’

Thane Hospital News : ‘शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव’

Thane Hospital : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गेल्या 24 तासात 18 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब समोर आली. या घटनेनं एकच खळबळ उडाली असून घटनेमुळं रुग्णालय प्रशासनाचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर आला. या घटनेनं पालिकेच्या आरोग्य यंत्रणेचे अक्षरश: धिंडवडे निघाले असून यावरूनच आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde) टीका केली आहे. (ncp leader jayant patil critisize em eknath shinde over kalwa hospital 18 death)

जयंत पाटील यांनी ट्विट करत प्रशासनावर रोष व्यक्त केला. त्यांनी लिहिलं की, ठाणे महानगरपालिका क्षेत्राच्या अंतर्गत येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रात्रभरात17 रुग्णांचा मृत्यू झाला ही अत्यंत दु:खद बाब आहे. शासन आपल्या दारी म्हणून गवगवा करणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दारातच आरोग्य सुविधांचा अभाव आहे. रुग्णालयात पुरेशा आरोग्य सुविधा नाहीत, डॉक्टर नाहीत, स्टाप नाही त्यामुळे रुग्णांवर उपचार करण्यासाठी साहजिकच मर्यादा आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्यांना सहन करावा लागतोय. लोकांचे नाहक जीव जात आहेत. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, असे ट्विट करत जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘सांगोलाकरांना वाट बदलायची सवय नाही’, शरद पवारांच्या विधानाने शाहाजी बापूंना धडकी 

या घटनेची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही दखल घेत प्रशासनावर ताशेरे ओढले. त्यांनी ट्विट करत लिहिलं की, ठाणे महापालिकेच्या कोपरा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात काल रात्रभर 17 रुग्णांचा मृत्यू झाल्यचाी हृदयद्रावक घडना घडली. गेल्या काही दिवसांपूर्वीच 5 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना देखील प्रशासनाला जाग आली नाही ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी असून सहवेदना व्यक्त करतो. मृत व्यक्तींना भावपूर्ण श्रध्दांजली, असं ट्विट पवारांनी केलं.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार चौकशी समिती गठीत करण्यात आली आहे. रुग्ण नातेवाईकांनी केलेल्या तक्रारी स्वत: समितीपुढे मांडणार असून जेणेकरून सर्वच बाजूने चौकशी करून समितील निष्कर्ष काढणे शक्य होणार आहे, असं महापालिका आयुक्त बांगर यांनी सांगितलं.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube