“पराभवाचा राग संसदेत काढू नका” : अधिवेशनाच्या सुरुवातीलाच PM मोदींचा काँग्रेसला टोला

“पराभवाचा राग संसदेत काढू नका” : अधिवेशनाच्या सुरुवातीलाच PM मोदींचा काँग्रेसला टोला

नवी दिल्ली : या अधिवेशनात तीन राज्यातील पराभवाचा राग काढण्याची योजना बनविण्यापेक्षा संसदेत विकासावर, देशातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यावर चर्चा करा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस (Congress) आणि विरोधातील इतर पक्षांना दिला. आजपासून (4 डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होत आहे. त्यापूर्वी देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते. (As the winter session of Parliament begins, Prime Minister Narendra Modi has given the Congress and other opposition parties.)

विरोधकांना सल्ला देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘काल चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आले. जे सामान्य लोकांच्या कल्याणासाठी, देशासाठी आणि देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध आहेत त्यांच्यासाठी हे निकाल उत्साह वाढविणारे आहेत. सध्याच्या निवडणुकीच्या निकालाच्या आधारे विरोधी पक्षात बसलेल्या मित्रांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या अधिवेशनात पराभवाचा राग काढण्याचे नियोजन न करता, या पराभवातून धडा घ्यावा. गेल्या नऊ वर्षांतील नकारात्मकतेचा त्याग करून या अधिवेशनात सकारात्मकतेने वाटचाल करावी. देशाने नकारात्मकता नाकारली आहे.

पक्षाकडून साईड लाईन झाल्यानंतरही मध्यप्रदेशात बाजीगर ठरले मामांजी; असा जिंकला गड

या अधिवेशनाच्या सुरुवातीला विरोधी पक्षांच्या सहकार्‍यांशी चर्चा केली, सर्वांच्या सहकार्याची आम्ही नेहमीच विनंती करतो. यावेळीही ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. लोकशाहीचे हे मंदिर लोकांच्या आकांक्षांसाठी आणि विकसित भारताचा पाया मजबूत करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. मी सर्व सन्माननीय खासदारांना विनंती करतो की त्यांनी जास्तीत जास्त तयारी करून यावे आणि सभागृहात जी काही विधेयके मांडली जातील त्यावर सखोल चर्चा करावी, अशीही विनंती पंतप्रधान मोदी यांनी केली.

आजपासून संसदेचे अधिवेशन :

आजपासून संसदेचे हिवाळी अधिवेश (Parliament Winter Session) सुरू होत आहे. निवडणुकीच्या निकालानंतर दुसऱ्याच दिवशी हे अधिवेशन सुरू होत असल्याने संसदेकडे सर्वाचे लक्ष आहे. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागणारे विरोधक बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न. महागाई, मणिपूरमधील हिंसाचार (Violence in Manipur) आणि तपास यंत्रणांचा वापर यावरून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. सरकारकडून या अधिवेशनात 37 विधेयके मांडली जाणार आहेत.

Parliament Session : संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात, ‘या’ मुद्द्यांवरून गदारोळ होण्याची चिन्ह

चार राज्यांच्या निकालात भाजपला बंपर यश :

काल जाहीर झालेल्या चार राज्यांच्या निकालात भाजपला बंपर यश मिळाले आहे. राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड ही उत्तरेतील महत्वाची राज्ये भाजपने जिंकली आहेत. राजस्थानमध्ये भाजपने 115 जागा जिंकल्या आहेत. तर मध्यप्रदेशमध्ये 164 आणि छत्तीसगडमध्ये 54 जागांवर घवघवीत यश मिळाले आहे. तर तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube