live now
Budget 2024 Live Update : प्राप्तिकर मर्यादेत बदल नाही; आयुष्यमानचं जाळ वाढवणार
Budget 2024 Live Update : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (दि.1) मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प सादर केला आहे. सादर करण्यात आलेलं हे बजेट अंतरिम असलं तरी, या अर्थसंकल्पात सीतारामन यांनी ‘युवक-महिला-गरीब-शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेवत अनेक घोषणा केल्या आहेत. प्राप्तिकर सवलतीत काय बदल होतात याकडे सर्वांच्या नजरा होत्या मात्र, यंदाच्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर मर्यादेत कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याची घोषणा सीतारामन यांनी केली आहे. तसेच आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी आयुष्यमान योजनेची व्याप्ती वाढवणार असल्याचे सीतारामन यांनी घोषित केले आहे.
LIVE NEWS & UPDATES
-
आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, सीतारामन यांचा करदात्यांना दणका
आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर भरणाऱ्यांसाठी ही घोषणा काहीशी निराशा देणारी आहे. सध्या 7 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कर आकारला जात नाही. यावेळी ही मर्यादा वाढवली जाईल अशी आशा नोकरदार आणि कर भरणाऱ्यांना होती. मात्र, सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकरात कोणताही बदल करण्या आलेला नाही.
-
अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे. अंगणवाडी सेविकांसाठी आयुष्मान भारत हेल्थ कव्हर सर्व आशा, अंगणवाडी सेविकांसाठी वाढवण्यात आले आहे. याशिवाय सध्याच्या आरोग्य पायाभूत सुविधांचा वापर करून आम्ही अधिक वैद्यकीय महाविद्यालये निर्माण केले जाईल असे सीतारामन यांनी सांगितले. 9 ते 14 वर्षे वयोगटातील मुलींना गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची लस दिली जाणार. मातृत्व आणि बालकांच्या विकासासाठी सर्वसमावेशक योजना तयार केली जाईल. अंगणवाडी केंद्रे अद्ययावत करण्यात येणार आहेत. पोषण 2.0 ची अंमलबजावणी जलद केली जाणार. आयुष्मान भारत अंतर्गत सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना त्याच्या कक्षेत आणले जाईल.
-
सरकार 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार
सरकार 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार असल्याची घोषणा सीतारामन यांनी अर्थसंकल्पात केली आहे. आतापर्यंत 2 कोटी महिला लखपती बनल्या असून, येणाऱ्याकाळात 3 कोटी महिलांना लखपतीदीदी बनवण्याचे लक्ष्य असल्याचे सीतारामन यांनी सांगितले. नऊ कोटी महिलांचा समावेश असलेल्या 83 लाख बचत गटांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. यामुळे एक कोटी महिलांना लखपती दीदी बनण्यास मदत झाली आहे.
-
सौरऊर्जा आणि गरीबांच्या घरांवर सरकारचे लक्ष
कोविडचे आव्हान असतानाही केंद्र सरकारने गरिबांना घरे दिली. घरांचे वाटप करण्याचा हा टप्पा 3 कोटी घरांचे उद्दिष्ट गाठण्याच्या जवळ असून, पुढील 5 वर्षांत आणखी 2 कोटी घरे बांधण्याचे उदिष्ट आहे. यातील 1 कोटी घरांवर सौर पॅनेल बसवण्यात येणार आहेत. राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा प्रसंगी पंतप्रधान मोदींनी ही घोषणा केल्याचे सीतारामन यांनी सांगितले. गेल्या 10 वर्षांत केंद्र सरकारने 3 हजार नवीन आयटीआय, 7 आयआयटी, 16 आयआयआयटी, 7 आयआयएम, 15 एम्स आणि 390 विद्यापीठे स्थापन केली आहेत.
-
'10 वर्षांत महिलांना 30 कोटी मुद्रा योजनेचे कर्ज दिले'
गेल्या 10 वर्षांत 30 कोटी मुद्रा योजनेतून महिला उद्योजकांना कर्ज देण्यात आल्याचे सीतारामन यांनी अंतरिम अर्थसंकल्पिय भाषणात सांगितले. कर्जासोबतच मोदी सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ग्रामीण भागातील महिलांना 70 टक्के घरे दिल्याचेही यावेळी सीतारामन यांनी सांगितले.
-
मोदी सरकारने देशाला नवी दिशा आणि नवी आशा दिली : अर्थमंत्री
मोदी सरकारने देशाला नवी दिशा आणि नवी आशा दिल्याचा उल्लेख करत अर्थमंत्र्यांनी सांगितले की, 11.8 कोटी शेतकऱ्यांना सरकारी मदत देण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेद्वारे रोख रक्कम थेट करोडो शेतकऱ्यांना हस्तांतरित करण्यात आली आहे. देशातील अन्नदाता या योजनेचा लाभ 4 कोटी शेतकऱ्यांना दिला जात आहे. मोदींच्या कार्यकाळात आम्ही 300 विद्यापीठे स्थापन केली तसेच एक तृतीयांश महिलांना आरक्षण दिले आहे.
-
गरिबांचे कल्याण, देशाचे कल्याण हेच उदिष्ट
'गरीबांचे कल्याण, देशाचे कल्याण' हा मंत्र घेऊन मोदी सरकार काम करत आहोत. 'सबका साथ सबका विकास' या उद्देशाने केंद्र सरकारने 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. गेल्या 10 वर्षांत भाजपनं सर्वांसाठी घरे, प्रत्येक घराला पाणी, सर्वांसाठी बँक खाती अशी कामे विक्रमी वेळेत पूर्ण केली आहेत. याशिवाय 80 कोटी नागरिकांना मोफत रेशन देण्यात आले. तसेच शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करण्यात आली. गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी यांच्यावर भाजपचे लक्ष असून, त्यांच्या गरजा, आकांक्षा आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
-
मोदींच्या 10 वर्षातील काळ म्हणजे परिवर्तनाचा काळ
भाषणादरम्यान सीतारामन यांनी केंद्र सरकारच्या योजनांचा उल्लेख करत 'सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास' या मोदी सरकारच्या व्हिजनबद्दल सांगितले. मोदींच्या कार्यकाळातील गेली 10 वर्षे परिवर्तनाचा काळ असल्याचे सांगत या काळात भारतीय अर्थव्यवस्था अतिशय वेगाने प्रगती करत असल्याचे सीतारामन म्हणाल्या.
-
2047 पर्यंत भारताला विकसित देश बनवू - अर्थमंत्री
अलीकडच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेत बरेच बदल झाले आहेत. 2014 मध्ये मोदींनी सत्ता हाती घेतली तेव्हा अनेक आव्हाने होती. अर्थव्यवस्थेला बळ मिळावे आणि लोकांना रोजगार मिळावा यासाठी अनेक कार्यक्रम व योजना जनतेसाठी राबवण्यात आल्याचे सीतारामन म्हणाल्या. सरकारचे लक्ष सर्वसमावेशक विकासावर असून, 2047 पर्यंत आम्ही भारताला विकसित देश बनवू असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे.
-
देशात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी मिळाल्या
अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाला सुरूवा झाली आहे. यावेळी त्यांनी देशातील जनता आशावादी असून, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देश पुढे जात आहे. 2014 मध्ये मोदींनी कामाला सुरुवात केली तेव्हा अनेक आव्हाने होती. या सर्व आव्हानांमधून मार्ग काढत भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्याचं सीतारामन म्हणाल्या.
-
बजेट सादर करताच अर्थमंत्र्यांच्या नावे मोठे रेकॉर्ड; चिदंबरमही पडणार मागे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन थोड्याच वेळात अर्थसंकल्प सादर (Union Budget 2024) करणार आहेत. या अर्थसंकल्पातून केंद्र सरकार कोणत्या मोठ्या घोषणा करणार, कोणत्या क्षेत्रासाठी किती निधीची तरतूद करणार याकडे देशवासियांचे लक्ष राहणार आहे. मात्र, अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री निर्मला सितारामनही (Nirmala Sitharaman) आजच्याच दिवशी एक खास रेकॉर्ड करणार आहेत. आज बजेट सादर केल्यानंतर त्यांच्या नावावर 5 पूर्ण आणि आजचे अंतरिम बजेट असे एकूण 6 बजेट सादर केल्याची नोंद होईल. सलग सहा वेळा अर्थसंकल्पीय भाषण करण्याचा विक्रम माजी अर्थमंत्री मोरारजी देसाई यांचा आहे.
-
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निर्मला सीतारामन यांना दिले दही-साखर
2024-25 चा अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली यावेळी राज्यमंत्री पंकज चौधरी आणि भागवत किशनराव कराड आणि वित्त मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह उपस्थित होते. यावेळी राष्ट्रपती मूर्मू यांनी परंपरेनुसार अर्थमंत्र्यांना दही-साखर खाऊ घालत त्यांना शुभेच्छा दिल्या.
-
अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार वधरला
अंतरिम अर्थसंकल्पापूर्वी, सेन्सेक्सची सुरुवात 248.4 अंकांनी वाढून 72,000.51 वर पोहोचला तर, निफ्टी 62.65 अंकांच्या वाढीसह 21,788.35 अंकांवर नोंदवण्यात आली.
-
सीतारामन संसदेत पोहोचल्या
अर्थमंत्री निर्माला सीतारामन संसदेत पोहोचल्या अकरा वाजण्याच्या सुमारास संसदेत सादर होणार अंतरिम बजेट.
VIDEO | Union Budget 2024: Finance Minister @nsitharaman arrives at Parliament complex.#Budget2024WithPTI pic.twitter.com/M1pVto1ybV
— Press Trust of India (@PTI_News) February 1, 2024
-
अर्थसंकल्पात महिलांसाठी मोठ्या घोषणांची शक्यता
आज सादर होणारे बजेट हे लेखानुदान बजेट असणार आहे. लोकसभा निवडणुकांनंतर संपूर्ण अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात फारशा तरतुदी होणार नसल्याचे मत काही जाणकारांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच आजच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा होण्याची शक्यता व्यक्त केल्या जात आहेत.