“पाकिस्तानसमोर फक्त अर्ध्या तासातच शरणागती”, राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात

Rahul Gandhi on Operation Sindoor : आज संसदेत ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान (Operation Sindoor) लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोदी (Rahul Gandhi) सरकारवर घणाघाती टीका केली. सरकारने सांगितलं होतं की 1.27 वाजेपर्यंत ऑपरेशन सुरू होते. रात्री 1.35 वाजता पाकिस्तानला फोन करुन माहिती देण्यात आली. पाकिस्तानला अशा पद्धतीने थेट माहिती का दिली गेली? पाकिस्तानला तुम्ही सांगितलं की आम्ही लढू इच्छित नाहीत. सरकारने पाकिस्तानसमोर अक्षरशः शरणागती पत्करली अर्ध्या तासात सरेंडर केलं. या सरकारमध्ये लढण्याची इच्छाशक्तीच नव्हती अशी टीका राहुल गांधी यांनी केली.
भारतीय सैन्यातील जवान वाघ आहेत. वाघाला स्वातंत्र्य द्यावं लागतं. सैन्याच्या वापरासाठी इच्छाशक्तीची गरज असते. देशासाठी काम करायचं असेल तर जवानांना सूट द्यावी लागते. मी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं भाषण ऐकलं. त्यांनी ऑपरेशन सिंदूरची तुलना 1971 च्या युद्धाशी केली. 1971 मध्ये सरकारमध्ये इच्छाशक्ती होती. सन 1971 मध्ये आम्ही अमेरिकेचंही ऐकलं नव्हतं.
पहलगाममध्ये क्रूर असा (Pahalgam Terror Attack) दहशतवादी हल्ला झाला. अतिरेक्यांनी कुणालाच सोडलं नाही. अत्यंत क्रूरपणे त्यांनी लोकांची हत्या केली. आम्ही सगळेच पाकिस्तानचा निषेध करतो. सगळ्याच पक्षांनी सरकारचं समर्थन केलं होतं. अगदी दृढपणे सरकार आणि सैन्याच्या पाठीशी आम्ही उभे होतो. पहलगाममध्ये जे घडलं ते अतिशय चुकीचं होतं.
चीनने सॅटेलाइटच्या माध्यमातून सर्व माहिती पाकिस्तानला दिली होती. आमचं म्हणणं ऐकलं असतं तर पाच लढाऊ विमानं गमवावी लागली नसती. चीनने पाकिस्तानच्या वायूसेनेला अपडेट केलं. पाकिस्तानी अधिकारी चीनकडूनच प्रशिक्षण घेत होते. आता आपली लढाई चीन आणि पाकिस्तान या दोन्ही देशांशी आहे असे राहुल गांधी म्हणाले.
मी आधीच म्हटलं होतं की चीन आणि पाकिस्तानला वेगळं ठेवा. याबाबतीत सरकारचं परराष्ट्र धोरण अपयशी ठरलं. खरी लढाई चीनबरोबर होती. पहलगाम हल्ल्याच्या पाठीमाग खरा हात पाकिस्तानी सैन्याचा प्रमुख असीम मुनीर याचा होता. पाकिस्तान आणि चीन एक झाले होते. सरकारला वाटलं की आपण पाकिस्तानशी लढत आहोत प्रत्यक्षात मात्र आपण पाकिस्तान आणि चीन या दोघांशीही लढत होतो.
पीएम मोदींमध्ये हिंमत असेल तर..
अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी 29 वेळा युद्धविरामाचा दावा केला. आता हिंमत असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संसदेत बोलून दाखवावं की ट्रम्प खोटं बोलत आहेत. इंदिरा गांधी यांच्याप्रमाणे हिंमत असेल तर पीएम मोदींनी बोलून दाखवावं. ट्रम्प खोटं बोलत आहेत असे सरकार स्पष्टपणे का बोलत नाही. पहलगाम हल्ल्यानंतर सर्वच देशांनी दहशतवादाचा निषेध केला. पण एकाही देशानी पाकिस्तानवर टीका केली नाही, त्याची निंदा केली नाही. पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड मुनीरने ट्रम्प यांची भेट घेतली. पीएम मोदी नाही भेटले पण मुनीरने प्रोटोकॉल तोडून ट्रम्प यांची भेट घेतली. इतकंच नाही तर या मुनीरने ट्रम्प यांच्याबरोबर लंचही केला. भारताचे परराष्ट्र मंत्री कुठं होते? असा सवाल राहुल गांधी यांनी केला.
तुम्हाला जबाबदारी घ्यायची नसेल तर खुर्ची खाली करा; राज्यसभेत काँग्रेस नेते खरगेंनी सरकारला घेरलं