वोट चोर गद्दी छोड! दिल्लीत राजकारण तापलं, काँग्रेसचा मोर्चा, लाखो कार्यकर्ते रस्त्यावर
काँग्रेसच्या लाखो कार्यकर्त्यांसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे या रॅलीत सहभागी झाले आहेत.
दिल्लीतील राजकारण पुन्हा एकदा तापलं आहे. (Congress) काँग्रेस पक्षाने केंद्र सरकारविरुद्ध मोर्चा काढला आहे. यामध्ये मतदार पुनरपडताळणी (SIR) बाबत गंभीर आरोप केले आहेत. मतदार याद्यांमध्ये फेरफार करण्यासाठी आणि मतांची चोरी करण्यासाठी SIR चा वापर केला जात असल्याचा दावा काँग्रेस करत आहे. या मुद्द्यासंदर्भात, काँग्रेसने आज दिल्लीच्या रामलीला मैदानावर “वोट चोर गद्दी छोड” या भव्य रॅलीचे आयोजन केलं आहे.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे या रॅलीत सहभागी झाले आहेत. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, लोकशाही वाचवण्यासाठी लाखो लोक या रॅलीत सहभागी होत आहेत. काँग्रेस हा लोकशाही मूल्यांचे रक्षण करणारा पक्ष आहे. ही रॅली पूर्णपणे भाजपच्या विरोधात आहे तसंच, ती मतचोरीच्या विरोधात आहे . लोकशाही वाचवण्यासाठी ही काँग्रेसची रॅली आहे.
कर्नाटक, महाराष्ट्र, हरियाणा आणि बिहारमध्ये मतचोरी झाल्याचा दावाही केसी वेणुगोपाल यांनी यावेळी केला. लोकांची भावना आहे की, मत चोरीला गेलं आहे. तसंच, ज्या उत्साहाने लोक स्वतःहून आले आहेत आणि रॅलीचा भाग बनत आहेत तो लोकशाही वाचवण्याचा आणि संविधानाचे रक्षण करण्याचा प्रयत्न आहे. देशभरातील लोक एक मिशन म्हणून आले आहेत, कारण भारतीय जनता पक्षाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात ब्रिटिशांसोबत लढा दिला असा गंभीर आरोप प्रमोद तिवारी यांनी केला.
काय आहेत मागण्या ?
१. मशीन रीडेबल मतदार यादी सर्व राजकीय पक्षांना निवडणुकीच्या एक महिना आधी दिली पाहिजे.
२. सीसीटीव्ही फुटेज नष्ट करण्याचा नियम देखील बदलला पाहिजे.
३. निवडणुकीनंतर ईव्हीएम पाहण्यासाठी दिली जावी. मतचोरीपेक्षा मोठे कोणतेही देशविरोधी काम नाही. सरकारला निवडणूक सुधारणा नको आहेत.
विचारलेले प्रश्न?
१. निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीतून सरन्यायाधीशांना (CJI) का वगळण्यात आले?
२. डिसेंबर २०२३ मध्ये कायदा बदलला की निवडणूक आयुक्तांना शिक्षा करता येणार नाही.
३. निवडणुकीच्या ४५ दिवसांनंतर सीसीटीव्ही फुटेज का हटवले?
