वायएसआर ते विजय रुपाणी… विमान, हेलिकॉप्टर अपघातात देशाने मोठे नेते गमविले

country lost major leaders in plane, helicopter accidents: अहमदाबाद येथे एअर इंडियाचे ड्रिमलाइनर (Air India Ahmedabad Plane Crash) हे विमान कोसळले. या विमानाने अहमदाबाद विमानतळाहून लंडनला जाण्यासाठी टेक ऑफ घेतले होते. विमानाने उड्डाण घेतल्यानंतर अवघ्या काही मिनिटात हे विमान मेडिकल कॉलेजच्या इमारतीवर कोसळले. या विमानात 230 प्रवासी होते. तर दोन पायलट आणि दहा क्रू मेंबर असे 242 जण प्रवास करत होते. त्यात केवळ एक जण भीषण अपघातातून बचावला. इतर सर्वजणांचा जागीच मृत्यू झाला. देशातील नागरिकांसह परदेशी व्यक्तींचा मृत्यू झाला. उद्योजक, नोकरी करणारे या अपघात मृत पावले. मृतात एक राजकीय नाव होते. ते नाव होते गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचे. रुपाणी हे त्यांच्या पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते. पण ही भेट अधुरीच राहिली. देशात अनेक राजकीय नेत्यांना विमान व हेलिकॉप्टर अपघातात जीव गमवावा लागलाय, यात दोन मुख्यमंत्री, खासदार, केंद्रीयमंत्री अशी मोठी यादी आहे, हेच आपण व्हिडिओतून जाणून घेऊया…
गुजरातचे मुख्यमंत्री बलवंतराव मेहता
यांचे विमान पाकने युद्धात पाडले
बलवंतराव मेहता हे थोर स्वांतत्र्यसेनानी होते. ते गुजरातचे दुसरे मुख्यमंत्री होते. 1965 मध्ये भारत-पाकिस्तान युद्ध सुरू होते. मुख्यमंत्री बलवंतराव मेहता हे 19 सप्टेंबरला विमानाने मिठापूर येथून कच्छला चालले होते. त्यांच्याबरोबर पत्नी, तीन कार्यकर्ते, पत्रकार होते. त्याचवेळी पाकच्या वायूसेनेच्या विमानाने मेहता हे प्रवास करत असलेल्या विमानावर हल्ला केला. त्यात मेहता यांच्यासह सर्वजणांचा मृत्यू झाला.
संजय गांधी यांचे ‘ते’ उड्डाण शेवटचे ठरले
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे पूत्र व काँग्रेसचे नेते संजय गांधी यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. संजय गांधी हे वैमानिक होते. त्यांना विमान उडविण्याचा छंद होता. 23 जून 1980 रोजी संजय गांधी यांनी दिल्लीतील सफदरजंग विमानतळावरून पिट्स एस 2 ए हे विमान उडविले. त्यांच्याबरोबर कॅप्टन सक्सेना हेही होते. आकाशात विमानाने अचानक तीन लूप घेतल्यानंतर चौथा लूपला विमानाचे इंजिन बंद पडले. त्यावेळी संजय गांधी हेच विमान चालवत होते. त्यानंतर काहीच क्षणात विमान जमिनीवर कोसळले. त्यात संजय गांधी आणि कॅप्शन सक्सेना या दोघांचाही मृत्यू झाला. (country lost major leaders in plane, helicopter accidents)
माधवराव शिंदे हे कानपूरला जात
असताना विमान कोसळले
माजी केंद्रीय मंत्री आणि काँग्रेस नेते माधवराव शिंदे यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. माधवराव शिंदे हे 30 सप्टेंबर 2001 रोजी हे एका छोट्या विमानाने उत्तर प्रदेशातील कानपूरला राजकीय सभेसाठी जात होते. त्यांच्या विमानात काही पत्रकारही होते. उत्तर प्रदेशमध्येच त्यांचे विमान कोसळले होते. विमानाचा स्फोट झाल्याने मृतदेह ओळखता येत नव्हते. माधवराव शिंदे यांच्या गळ्यातील लॉकेटवरून त्यांची ओळख पटविण्यात आली.
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएसआर यांचे हेलिकॉप्टर कोसळले
आंध प्रदेशचे काँग्रेसचे मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचा पदावर असताना हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू झाला. आंध्र प्रदेश सरकारच्या मालकीचे बेल 430 हेलिकॉप्टर मुख्यमंत्री वायएसआर हे वापरत. 2 सप्टेंबर 2009 रोजी वायएस राजशेखर रेड्डी यांच्याबरोबर आणखी तिघे चित्तूर जिल्ह्यातील एका गावाकडे हेलिकॉप्टरने जात होते. सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास नल्लामलाच्या घनदाट जंगलात हे हेलिकॉप्टर कोसळले. त्यात वायएस राजशेखर रेड्डी यांच्यासह पायलट व चार जण असा पाच जणांचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी हेलिकॉप्टरचे अवशेष व मृतदेह आढळून आले. वायएसआर रेड्डी हे 2004 ते 2009 काळात दोनदा मुख्यमंत्री झाले होते. ते जनतेच्या गळ्यातील ताईत होते. वायएसआर यांचा मृत्यूची बातमी कळाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना प्रचंड दुख: झाले. त्यात अनेकांना ह्दयविकाराचा झटका आला तर काहींनी आत्महत्या केल्या. त्यावेळी तब्बल 122 जणांचा मृत्यू झाला होता. एेवढे ते लाडके मुख्यमंत्री होते.
अरुणाचल प्रदेशने मुख्यमंत्री गमाविले !
अरुणाचल प्रदेशने हेलिकॉप्टर अपघातात विद्यमान मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री असे दोघे गमविले आहेत. 30 एप्रिल 2011 रोजी अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोरजी खांडू यांना हेलिकॉप्टर अपघातात जीव गमवावा लागला. 30 एप्रिल रोजी सकाळी ते हेलिकॉप्टरने तवांगहून इटानगरला जात होते. हेलिकॉप्टर टेकऑफ झाल्यानंतर वीस मिनिटामध्ये सेला खिंडीजवळ हेलिकॉप्टर क्रॅश. पवण हंस कंपनीचे हेलिकॉप्टर 13,000 हजार फूट उंचीवरून उडत होते. हे हेलिकॉप्टर शोधण्यासाठी चार दिवस लागले होते. 4 मे रोजी लष्करी पथकाला जंगलात दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर आढळून आले. त्यात खांडू यांच्यासह चार जणांचा मृत्यू झाला.
ओपी जिंदल आणि सुरेंद्र सिंह
प्रसिद्ध उद्योगपती आणि हरियाणाचे ऊर्जामंत्री ओपी जिंदल आणि कृषीमंत्री सुरेंद्र सिंह 2005 मध्ये हेलिकॉप्टर अपघाताचे बळी ठरले. त्यांचे किंग कोब्रा हेलिकॉप्टर दिल्लीहून चंदीगडला जात असताना, उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे अपघात झाला होता. यामध्ये दोघांचाही मृत्यू झाला होता.
लोकसभा अध्यक्ष बालयोगीही अपघातानेच हिरवले
तेलुगू देसम पक्षाचे नेते आणि लोकसभा अध्यक्ष जीएमसी बालयोगी यांचाही अपघातातच मृत्यू झाला. 3 मार्च 2002 रोजी एका खाजगी हेलिकॉप्टरमधून ते प्रवास करत होते. आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील कोवादलंका गावात आपत्कालीन लँडिंगदरम्यान बालयोगी यांचे हेलिकॉप्टर कोसळले होते.
सीडीएस रावत यांचा मृत्यूही हेलिकॉप्टर अपघातात
हवाईदलाचे हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या दुर्घटनेत देशाने संरक्षण दलाचा प्रमुख गमावलाय. हेलिकॉप्टर दुर्घटनेत चीफ ऑफ डिफेन्स अर्थात CDSजनरल बिपीन रावत यांचा मृत्यू झाला होता. जनरल बिपीन रावत यांच्यासह त्यांची पत्नी मधुलिका आणि हेलिकॉप्टरमधील उच्चस्तरीय लष्करातील अधिकारी अशा 12 जणांनी प्राण गमावले होते. दोन इंजिन असलेलं IAF Mi-17V5 हे हेलिकॉप्टर अतिशय सुरक्षित समजले जाते. हे हेलिकॉप्टर रशियन बनावटीचे आहे. या हेलिकॉप्टरमधून रावत व इतर जण 8 डिसेंबर 2021 प्रवास करत होते. कर्नाटकातील उटीजवळ व तामिळनाडूच्या सीमेवरील निलगिरी जंगलात हेलिकॉप्टर क्रॅश झाले. त्यात सर्वजण आगीच्या भक्ष्यस्थळी पडले. त्यात मृत्यूमुखी पडलेल्या सर्व जणांची डीएनए चाचणी करून त्यांची ओळख पटविण्यात आली. कधी नैसर्गिक आपत्ती, इंजिनमध्ये झालेल्या बिघाडामुळे हे भीषण अपघात झालेत. त्यातून न भरून निघणारी हानी ही देशाला सोसावी लागलीय.