राज्यसभा निवडणुकीत काय होणार? भाजपच्या खेळीने तीन राज्यांमध्ये INDIA आघाडीचा जीव टांगणीला

राज्यसभा निवडणुकीत काय होणार? भाजपच्या खेळीने तीन राज्यांमध्ये INDIA आघाडीचा जीव टांगणीला

नवी दिल्ली : देशातील 15 राज्यांमधील 56 जागांसाठी राज्यसभा निवडणुकींची घोषणा झाली आहे. यातील 12 राज्यांमधील 41 जागांवर बिनविरोध निवडणूक झाली आहे. तर तीन राज्यांमधील 15 जागांसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान होणार आहे. या तीन राज्यांमध्ये उत्तर प्रदेशच्या 10, कर्नाटकमधील चार आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेचा समावेश आहे. या कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसकडे (Congress) तर उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्षाकडे (Samajwadi Party) त्यांचे खासदार निवडून आणण्यासाठी पुरसे बहुमत आहे. मात्र भाजपने तिन्ही ठिकाणी (BJP) एक उमेदवार अतिरिक्त दिल्याने काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची धाकधूक वाढली आहे. (Voting for 15 Rajya Sabha seats in three states will be held on February 27.)

नेमकी काय आहे परिस्थिती?

बिनविरोध निवड झालेल्या 41 जागांपैकी 20 जागा भाजपच्या खात्यात गेल्या आहेत. तर काँग्रेसला सहा, तृणमूल काँग्रेसला चार, वायएसआर काँग्रेसला तीन, राष्ट्रीय जनता दल दोन, बीजू जनता दल दोन शिवसेनेला एक, भारत राष्ट्र समितीला आणि संयुक्त जनता दलला प्रत्येकी एका जागेवर विजय मिळवता आला आहे. तर आता उत्तर प्रदेशच्या 10, कर्नाटकमधील चार आणि हिमाचल प्रदेशमधील एका जागेसाठी येत्या 27 फेब्रुवारीला मतदान आणि मतमोजणी पार पडणार आहे?

Lok Sabha Election : ‘यूपी’त आघाडी टिकणार; काँग्रेसच्या फॉर्म्यूल्याने जागावाटपाचा तिढा सुटला

तीन राज्यांमधील संख्याबळ काय सांगते?

निवडणूक होणाऱ्या 15 जागांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10 जागांसाठी मतदान होणार आहे. विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार इथून भाजपचे सात आणि समाजवादी पक्षाचे तीन उमेदवार विजयी होऊ शकतात. पण भाजपने अखेरच्या दिवशी आठवा उमेदवार रिंगणात उतरवर निवडणुकीत रंगत आणळी आहे. सर्व आठ उमेदवारांना विजयी करण्यासाठी भाजपला 296 मतांची आवश्यकता आहे. तर भाजपकडे मित्रपक्षांचे मिळून सध्या 286 आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे आठवा उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजपला 10 मते कमी पडत आहेत. तर समाजवादी पक्षाकडे अगदीच काठावरची म्हणजे 111 मते आहेत.

उत्तर प्रदेशसोबत हिमाचल प्रदेशातील एका जागेसाठीही निवडणूक होणार आहे. 68 विधानसभा सदस्य असलेल्या हिमाचलमध्ये विजयासाठी 35 मतांची आवश्यकता आहे. येथे काँग्रेसकडे 40 आमदार आहेत. तर तीन अपक्ष आमदार आहेत. त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. पण भाजपने काँग्रेसमधून आलेल्या हर्ष महाजन यांना उमेदवारी दिली आहे. भाजपकडे 25 आमदार आहेत. त्यांना विजयासाठी दहा आमदारांची आवश्यकता आहे.

बैलगाडा मालक पंढरीशेठ फडकेंचे निधन : गणपत गायकवाडांआधी राहुल पाटलांवर केला होता गोळीबार

कर्नाटकमधील राज्यसभेच्या चार जागांसाठी काँग्रेसने तीन आणि भाजप-संयुक्त जनता दल आघाडीने दोन उमेदवारांना रिंगणात उतरवले आहे. एका उमेदवाराला विजयासाठी 45 मतांची आवश्यकता आहे. कर्नाटकमध्ये 224 पैकी काँग्रेसचे 135 आमदार आहेत. तर भाजपकडे 66 आणि संयुक्त जनता दलाकडे 19 आमदार आहेत. याशिवाय दोन अपक्ष आणि दोन इतरही आमदार आहेत. काँग्रेसला तीन उमेदवारांच्या विजयासाठी 135 मते गरजेची आहेत आणि तेवढेच आमदार असल्याने अगदीच काठावरची मते आहेत. तर भाजप-संयुक्त जनता दलाला दुसऱ्या उमेदवाराच्या विजयासाठी पाच मतांची आवश्यता आहे. त्यामुळे दोन अपक्ष आणि दोन इतर आमदारांना मोठे महत्व प्राप्त झाले आहे. सोबतच काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्यास निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज