सुपरस्टार विजयच्या निवडणूक रॅलीत चेंगराचेंगरी कशामुळं झाली?, ‘हे’ मोठ कारण आलं समोर
सुपरस्टार विजय यांच्या निवडणूक रॅलीत झालेल्या चेंगराचेंगरीमुळे 39 लोकांचा मृत्यू झाला. 17 महिला, 13 पुरुष, 4 मुलं अन् 5 मुली.

अभिनेता ते नेते बनलेले विजय थलपती यांची तमिळनाडूच्या करूर येथे रॅली होती. (Vijay) या रॅलीचे मात्र उत्साहातून शोकात रुपांतर झाल. आपल्या आवडत्या सुपरस्टारला जवळून पाहण्याच्या उत्साहात लोकांनी मोठी गर्दी केली होती. अखेर येथे चेंगराचेंगरी झाली आणि त्यामध्ये तब्बल 39 जणांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये 17 महिला, 13 पुरुष, 4 मुले आणि 5 मुलींचा समावेश आहे. त्याचबरोबर यामध्ये सुमारे 60 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. या चेंगराचेंगरीचं खरं कारण समोर आलं आहे.
अभिनेता विजय यांच्या या महारॅलीत गर्दी इतकी प्रचंड होती की काही लोक विजय यांची एक झलक पाहण्यासाठी झाडाच्या फांद्यांवर चढले. प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्यापैकी काही लोक झाडाच्या फांदीवरून खाली पडले आणि विजय यांच्या प्रचार व्हॅनच्या मागे उभ्या असलेल्या लोकांवर कोसळले. तिथूनच अचानक गोंधळ सुरु झाला. गर्दीत काहीतरी मोठा अपघात झाल्याची भीती पसरली आणि लोक इकडे-तिकडे पळू लागले. काही क्षणातच तिथे चेंगराचेंगरी झाली. स्वत:चा जीव मूठीत घेऊन पळताना काही लोक जमिनीवर पडले.
तमिळनाडूचे डीजीपी जी. वेंकटरामन यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, रॅलीसाठी दुपारी 3 ते रात्री 10 वाजेपर्यंत परवानगी होती, पण विजय यांच्या अधिकृत एक्स अकाऊंटवर दुपारी 12 वाजता येण्याची घोषणा झाली होती. यामुळे लोक सकाळी 11 वाजल्यापासूनच रॅली स्थळावर जमू लागले होते. मात्र, विजय सायंकाळी 7:40 वाजता पोहोचले. डीजीपी म्हणाले, लोक तासन्तास ऊनात अन्न-पाण्याशिवाय वाट पाहत होते. यामुळे गर्दी अस्वस्थ झाली. आमचा कोणाला दोष देण्याचा हेतू नाही, पण बराचवेळ प्रतीक्षा आणि गर्दीच्या संख्येमुळे परिस्थिती बिघडली.
पोलिसांच्या मते, आयोजकांनी 10,000 लोकांची परवानगी घेतली होती, पण सुमारे 27,000 लोक जमले. वाढत्या गर्दीसमोर परिस्थिती नियंत्रणात राहिली नाही. सुपरस्टार विजय यांची झलक पाहण्याचे स्वप्न पाहणारे हजारो लोक कधीच विचार करू शकले नसते की ही रॅली इतक्या वेदनादायक शोकांतिकेत बदलेल. झाडाच्या फांदीवरून पडलेली एक व्यक्ती त्या मृत्यूच्या लाटेची सुरुवात ठरली, ज्याने 39 निरपराध जीव घेतले. पोलिसांनी TVK च्या दोन वरिष्ठ नेत्यांवर, एन. आनंद आणि सीटी निरमल कुमार यांच्यावर गैरहत्येचा गुन्हा दाखल केला आहे.