‘थोडं संवेदनशीलपणे बोलत चला…’; बाळासाहेब थोरातांनी टोचले कृषिमंत्र्यांचे कान

Balasaheb Thorat : गेल्या आठवड्यात अवकाळी पावसामुळे (Unseasonal Rains) शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी करताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंनी (Manikrao Kokate) वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. ढेकळांचे पंचनामे करायचे का? असं विधान त्यांनी केलं. तसंच कृषी खातं ही ओसाड गावची पाटीलकी असल्याचंही ते म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्यावर आता कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरातांनी (Balasaheb Thorat) भाष्य केलं.
मराठवाड्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला धक्का, ‘हा’ मोठा नेता अजित पवारांच्या गळाला, प्रवेशही ठरला
पंचनामे कधी करणार?
बाळासाहेब थोरातांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या नुकसानीबद्दल बोलताना ते म्हणाले की, आपण अनेक पावसाळे पाहिले. मात्र, यंदाचा मान्सूनपूर्व पाऊस सलग तीन आठवडे झाला. त्यामुळं अनेक ठिकाणी शेतीमालाचे मोठं नुकसान झालं. फळबागांचे नुकसान झालं. केळी, संत्री, डाळींब, आंबा या पिकांना पावसाचा तडाखा बसला. या व्यतिरिक्त उन्हाळी पिकांचही नुकसान झालं. भाजीपाला, कांदा पिकांनाही अवकाळीचा फटका बसला. त्यामुळं शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं. लागवड खर्चही निघणार नसल्याची परिस्थिती आहे.मात्र, प्रशासनाने कुठलाही मदतीची घोषणा केली नाही. सरकार म्हणून तुम्ही पंचनामे कसे आणि कधी करणार?, असा सवाल थोरातांनी केला.
सरसकट ५० हजार रुपयांची मदत जाहीर करा
राज्यात शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालं. मात्र, फिल्डवर प्रशासन, प्रशासनाताले अधिकारी, पालकमंत्री फिरकत नाहीत. पालकमंत्र्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे, असं ते म्हणाले. तसेच शेतकऱ्यांना तातडीने काहीतरी दिलासा दिला पाहिजे. शेतकऱ्यांना तुटपूंजी मदत न करता हेक्टरी सरसकट ५० हजार रुपयांची मदत जाहीर करा, अशी मागणी थोरातांनी केला.
…अन्य़था मोठा उद्रेक होणार
शेतकरी हा अर्थव्यव्थेचा कणा आहे. आज शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार म्हणून भक्कमपणे उभं राहिले पाहिजे. सरकारने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, अन्यथा मोठा उद्रेक होणार, असा इशाराही थोरातांनी दिला.
थोरातांचा कोकाटेंना सल्ला
यावेळी थोरातांनी कृषिमंत्र्यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. ते म्हणाले, कृषिमंत्र्यांचा स्वभाव तसा आहे. त्यांच्या स्वभावाची सवय आम्हाला आहे. मात्र, महरष्ट्रातील शेतकऱ्यांनीही तसंच ऐकलं पाहिज, अशी अपेक्षा करता येत नाही. शेतकऱ्यांविषयी बोलताना थोडं संवेदनशील असलं पाहिजे. आपण पालक आहोत. संकटकाळात आपण शेतकऱ्यांना दिलासा द्यायला पाहिजे, असं ते म्हणाले.
कृषी खातं ही ओसाड गावची पाटीलकी आहे, या कोकाटेंच्या वक्तव्यावर थोरात म्हणाले की, अलीडकच्या काळात कोणतं खाते ओसाड आहे, अन् कोणते खातं हे बागायत आहे, हे ठरलं असेल. त्यामुळं कोणते गाव बागायती अन् कोणते ओसाड आहेत, हे कृषिमंत्र्यांनाच विचारा, असा टोला थोरातांनी लगावला.