बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती…; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती…; मुख्यमंत्री शिंदे यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

CM Eknath Shinde : शिवसेनेतील बंडानंतर शिंदे गट व ठाकरे गट निर्माण झाला. यामुळे दोन्ही गटातील नेतेमंडळी एकमेकांवर टीका टिप्पणी करत असतात. नुकतेच उद्धव ठाकरेंनी केलेल्या एका विधानाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खरपूस समाचार घेतला. बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती आमची वृत्तीच नाही, अशा शब्दात शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

पाहा शिंदे ट्विटमध्ये नेमकं काय म्हणाले…
बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण सत्याला सामोरे जाण्याची छाती तुमच्याकडे नाही. आम्हाला कोणताही बदला घ्यायचा नाही. ती मुळ आमची वृत्तीच नाही. आम्हाला बदल घडवायचा आहे. या राज्यातील जनतेच्या आयुष्यात बदल घडवायचाय . गरीब, कष्टकऱ्यांच्या जीवनात बदल घडवायचाय. स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर खरे चित्र कधीच उमटत नाही. त्यासाठी निस्वार्थी जनसेवेचा कॅमेरा माणसाकडे असावा लागतो. तुमच्याकडे तो कधीच नव्हता आणि येण्याची शक्यताही नाही.

उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?
राज्यात आपलं सरकार असताना किती प्रकल्प तसेच उद्योग आले होते. आणि आता यांच्यावेळी किती गेले. उद्योग धंदे गेले तरी यांचे शेपट्या आतमध्ये आहेत. मी नुकतेच एक ट्विट बघितले बुटाची कंपनी महाराष्ट्रात येणार असं म्हटलं तीही कंपनी तामिळनाडूला गेली, बसा तुम्ही जोडे पुसत. सरकार पाडलं त्याचा मी बदला घेणार म्हणजे घेणारच, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे…
काहीही श्रम न करता पैसा आणि पद मिळाले की माणसांचा मेंदू काम करेनासा होतो. कष्टकरी, श्रमजीवी यांच्याविषयी त्यांच्या मनात आस्था राहत नाही. तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली माणसे तळागाळातल्या लोकांना, त्यांच्या कामाला तुच्छ लेखतात. दुसऱ्यांना कायम हीन लेखण्यात, त्यांचा द्वेष करण्यात त्यांचे आयुष्य जाते. म्हणूनच त्यांना जोडे पुसणारी व्यक्ती कमी दर्जाची वाटते आणि त्यांचा ते अपमान करतात.

जोडे पुसणारे गरीब असतील. पण ते तुमच्यापेक्षा कदाचित जास्त प्रामाणिक असतात. कारण ते स्वतःच्या मेहनतीची भाकर खातात. ते विश्वासघातकी नसतात. चहावाला, रिक्षावाला, टपरीवाला, वॉचमन हे समाजघटक नेतृत्वही करू शकतात, हेच ज्यांच्या पचनी पडत नाही, त्यांना कायम पोटदुखी जडलेली असते. वडिलांच्या कर्तृत्वावर आयत्या रेघोट्या मारायलाही ज्यांना धड जमत नाही त्यांच्या पात्रतेबाबत काही न बोललेलेच बरे…. केवळ कुटुंबापुरता विचार करून आणि हपापलेपणाचा चष्मा घालून वावरणारी ही माणसे आहेत. ‘धनसेवा हीच ईश्वरसेवा’ ही यांची वृत्ती आहे. परंतु, संधी मिळेल तेव्हा ही तळागाळातील सामान्य माणसे या लोकांना मतदानातून जोडे मारतील, हे नक्की.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube