‘काडतूस असतो ना काडतूस, तो आत गेल्यावर’.. नारायण राणेंनीही सांगितली काडतुसाची व्याख्या

‘काडतूस असतो ना काडतूस, तो आत गेल्यावर’.. नारायण राणेंनीही सांगितली काडतुसाची व्याख्या

Narayan Rane On Uddhav Thackeray : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना फडतूस गृहमंत्री म्हटल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर तुफान हल्ला सुरू ठेवला आहे. आज तर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) मैदानात उतरले आहेत. त्यांनी आज पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली. राणे यांनी संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवत ‘काडतूस’ म्हणजे काय याचा अफलातून अर्थही सांगितला.

पत्रकार परिषदेत त्यांना पत्रकारांनी संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल विचारले. ‘फडणवीस हे तर भिजलेले काडतूस आहेत. ईडी आणि सीबीआय बाजूला ठेऊन या मग बघू या’ अशा इशारेवजा भाषेत राऊत यांनी फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले होते. यावर राणे चांगलेच भडकले.

ते म्हणाले, ‘मला संजय राऊत या विकृत माणसाबद्दल काहीच बोलायचे नाही. काडतूस असतो ना काडतूस तो आत गेल्यावरच कळते. अगोदर त्याचे महत्व कळत नाही आणि कळते तेव्हा माणूस वर गेलेला असतो’, अशी काडतुसाची व्याख्या आहे.

आदित्य बाळाने बाळासारखंच वागावं, राणेंचा शेलक्या शब्दांत सल्ला

उद्धव ठाकरे यांनी फडणवीस यांच्यावर केलेल्या टीकेवर राणे म्हणाले, ‘फडणवीस यांना तुम्ही ओळखता. जसे राजकारणात आले तसे तुम्ही त्यांना पाहता. मुख्यमंत्री होते आता गृहमंत्री आहेत. नेते आहेत. चांगले काम करत आहेत. त्यांची ओळख चांगला माणूस अशी आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याने काहीच फरक पडत नाही. त्यांना चांगल्या गोष्टी करता येत नाहीत. ते कधी चांगले बोलणारही नाहीत. जनताच आता सांगत आहे की देवेंद्र फडणवीस कसे आहेत ते ?, त्यांच्या नावातच देव आहे मग तुम्ही देखील समजून जा’, असे त्यांनी येथे उपस्थित पत्रकारांना सांगितले.

 

आव्हाड, ठाकरेंना काम नाही

राज्याचे गृहमंत्री कमजोर आहेत. त्यांचं अपयश आहे म्हणून आता राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे मोर्चा काढणार आहेत. यावर राणे म्हणाले, ‘देशात लोकशाही आहे त्यामुळे कुणीही मोर्चा काढू शकतो. मोर्चा काढला म्हणजे गृहमंत्री कमजोर आहेत असे होत नाही. यात गृहमंत्र्यांची कमजोरी कुठे आहे ?, ते आता सत्तेत नाहीत. त्यामुळे त्यांना काहीच काम राहिलेले नाही त्यामुळे ते आता असे मोर्चे काढत राहतील.’

ठाकरे फडतूस, दगाबाज माणूस, केंद्रीय मंत्री राणेंनीही ठाकरेंना सोडलं नाही

 

जितके ठाकरे माहिती आहेत तेवढेच बस्स

पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने राणे यांच्या शिवसेनेत असतानाच्या कार्यकाळाचा उल्लेख केला. त्यानंतर ठाकरे कुटुंबियांचे आडवाव ठाकरे नाही तर ठाकूर असे आहे आणि ते मध्य प्रदेशातील इंदूर येथील रहिवासी आहेत असे पत्रकाराने सांगताच राणे म्हणाले, की मला माहिती आहेत तितकेच ठाकरे बस झाले. ठाकूर वगैरे कुणी नको. नाहीतर दुसराच अध्याय येथे सुरू होईल.

 

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube