Sanjay Shirsat : नार्वेकरांना कायदेशीर उत्तर देऊ; राऊतांवरही टीका, ‘आधी विष कालवलं अन् आता…’

Sanjay Shirsat : नार्वेकरांना कायदेशीर उत्तर देऊ; राऊतांवरही टीका, ‘आधी विष कालवलं अन् आता…’

MLA Sanjay Shirsat On Sanjay Raut : सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचं प्रकरणं गेलं तेव्हा न्यायालयाने आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांवर सोपवली होती. त्यानंतर शिवसेनेच्या (Shiv Sena) घटनेचा अभ्यास करून आपण यावर निर्णय घेऊ असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी सांगितलं होतं. निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेची प्रत नार्वेकरांना पाठवल्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या दोन्ही गटांना नोटीसा बजावल्या. त्यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांनी नार्वेकरांना कायदेशीर उत्तर देऊ, अशी प्रतिक्रिया दिली. (MLA Sanjay Shirsat On Sanjay Raut and Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar notice)

https://www.youtube.com/watch?v=RhZq-lPLC0s

आज माध्यमांशी बोलतांना आमदार शिरसाट म्हणाले, आम्हाला अजून पर्यंत नोटीस आलेली नाही. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जर नोटीस पाठवली असेल तर त्याला आम्ही कायदेशीरपणे उत्तर देऊ. हा त्यांचा अधिकार आहे. सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सनुसार त्यांनी नोटीस बजावली आहे. त्यामुळं कायदेशीर प्रक्रियेला आम्ही आडवं जाऊ शकत नाही. आमची बाजू ऐकल्यानंतर विधानसभा अध्यक्षांना निर्णय द्यायचा आहे. आमच्या उठावाला २/३ बहुमत असल्यामुळे आमच्या पक्षाला आणि चिन्हाला मान्यता मिळालेली आहे. त्यामुळं विधानसभा अध्यक्षांचा निकाल हा आमच्या बाजूने लागेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

‘नीलमताई, माणूस म्हणून तुम्ही कमालीच्या भणंग अन् कफल्लक’; अंधारेंचा गोऱ्हेंवर घणाघात 

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालविषयी विचारले असता शिरसाट म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने आधीच आमच्या बाजूने निकाल दिलेला आहे. परंतु निकालाचा आपल्या सोईने अन्वयार्थ लावण्याचं काम ठाकरे गटाने केलं. त्यांनी जनतेची दिशाभुल केली. ते सांगतात की, शिंद गटाला कोर्टानं फटकारलं. निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने एका वाक्यात सांगितलं की, एकदा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यावर विषय संपतो. मात्र, ठाकरे गट याकडे दुर्लक्ष करतो आणि शिंदे गटाला कोर्टानं फटकारलं असं सांगतो. हा चुकीचा मेसेज शिल्लक सेना वाचवण्यासाठी पेरला जातोय, असं शिरसाट म्हणाले.

काल संजय राऊत यांनी शिंदे गटातील नाराज आमदार आमच्या संपर्कात असून ते कधीही आमच्या पक्षात येऊ शकतात, असं वक्तव्य केलं. यावरही शिरसाट यांनी भाष्य केलं. ते म्हणाले, आम्हाला संजय राऊत गद्दार म्हणतात. आमची बदनामी करतात.
उद्धव ठाकरे यांना संपवण्यासाठी संजय राऊत हेच एकमेव कारणीभुत आहे. राऊत यांच्यामुळे दोघांमध्ये इतके अंतर वाढलं आहे की भविष्यात जवळ येऊ की नाही याची शंका आहे. आधी विष कालवलं आणि आता राऊतांना पश्चाताप होत आहे. पश्चातापापोटी राऊत असं बोलले असतील, असा टोलाही शिरसाट यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube