‘तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोकांनी राष्ट्रवादी सोडली?’ अजित पवार गटाचा आव्हाडांना सवाल
![‘तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोकांनी राष्ट्रवादी सोडली?’ अजित पवार गटाचा आव्हाडांना सवाल ‘तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोकांनी राष्ट्रवादी सोडली?’ अजित पवार गटाचा आव्हाडांना सवाल](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/05/jitendra-awhad-3.jpg)
Jitendra Awhad : राष्ट्रवादीतील तिढा आता (NCP Crisis) निवडणूक आयोगाच्या (Election Commission) कोर्टात पोहोचला आहे. अजित पवार गटाने बाहेर पडल्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा ठोकला. त्यावरून शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटानेही जोरदार पलटवार केला आहे. शरद पवारांनी रक्त आटवून पक्षाचा विस्तार केला. अजित पवारांचा पक्षाच्या विस्तारात कुठलाही हातभार नाही अशी टीका आव्हाड यांनी केली आहे. त्यांच्या या टीकेवर अजित पवार गटाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी तुमचे पक्षवाढीसाठी किती योगदान आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे, असा खोचक टोला आव्हाडांना लगावला.
Jitendra Awhad : करारा जवाब मिलेगा..! ‘त्या’ वक्तव्यावर आव्हाडांचा बावनकुळेंना इशारा
शरद पवारांनी घामाचा एक एक थेंब गाळून पक्ष वाढवला आहे. मांडीचे हाड मोडलेले असतानाही पक्षासाठी काम केलं. एका पोराला मोठं करण्यात बापाचं जितकं योगदान असतं तितकच योगदान शरद पवारांनी पक्षासाठी दिलं आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. त्यांच्या या टीकेनंतर अजित पवार गटानेही जोरदार पलटवार केला आहे. अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण म्हणाले, की अजित पवार आणि शरद पवारांनी तुम्हाला वैद्यकिय शिक्षण खात्याचे कॅबिनेट मंत्रीपद दिलं. राज्यात काम करण्याची संधी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या काळातही गृहनिर्माण खाते तुमच्याकडे होते. मात्र, तुम्हाला इतके सगळे दिल्यानंतरही ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुमच्या त्रासाला कंटाळून किती लोक राष्ट्रवादी सोडून गेले याचे आत्मपरिक्षण करा, असा सल्ला चव्हाण यांनी आव्हाड यांना दिला.
तुमचे पक्षवाढीसाठी किती योगदान आहे हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे तुमच्यासारख्या व्यक्तीने अजित पवार यांच्या नेतृत्वाबाबत बोलणे म्हणजे आकाशाला लाथा मारण्याचाच प्रकार आहे, अशी खरमरीत टीका चव्हाण यांनी आव्हाडांवर केली. या प्रत्युत्तरानंतर आता जितेंद्र आव्हाड परत काही बोलतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
Jitendra Awhad : शरद पवार-उद्धव ठाकरे भेटीत चर्चा काय? आव्हाडांनी स्पष्टच सांगितलं
काय म्हणाले होते जितेंद्र आव्हाड ?
अजित पवार यांनी पक्षाचं कोणतंही पद उपभोगलेलं नाही. त्यामुळे त्यांनी पक्षासाठी कोणतेही योगदान दिलेलं नाही. तर राष्ट्रवादी हा पक्ष शरद पवारांनी रक्त आटवून वाढवलाय. त्यामुळे एका मुलाला मोठं करण्यात वडिलांचे जेवढे योगदान असतं. तेच योगदान राष्ट्रवादीसाठी शरद पवारांचं आहे. मात्र अजित पवारांनी कधीही कोणतही पद पक्षाचं उपभोगलेले नाही. त्यांचं पक्षासाठी काहीही योगदान नाही.