विद्यार्थ्यांची आत्महत्या तरीही मोदींना पाझर फुटत नाही…अण्णांच्या आंदोलनाची आठवण करुन देत शेट्टींची टीका…
नीट पेपर लिक प्रकरणी आंदोलनावरुन राजू शेट्टी यांनी अण्णा हजारे यांच्या आंदोलनाची आठवण करुन देत मोदी सरकारवर टीका केलीयं.
Raj Shetty News : नीट पेपर फुटीप्रकरणी 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली तरीही पंतप्रधान मोदींना पाझर फुटत नाही, या शब्दांत माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी टीका केली आहे. नीट पेपर फुटीप्रकरणी दिल्लीतील जंतर मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांचं आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाची भाजप साधी दखलही घेत नसून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंच्या आंदोलनाची आठवण सांगत शेट्टी यांनी मोदी सरकारवर सडकून टीका केलीयं.
राजू शेट्टी म्हणाले, २०११ मध्ये ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिल्लीत ‘जन लोकपाल विधेयक’ संमत करावे, या मागणीसाठी रामलीला मैदानावर उपोषण केले होते. मी त्यावेळी लोकसभेचा सदस्य होतो. अण्णा हजारे यांनी केलेली मागणी मान्य करावी म्हणून विरोधी पक्षातील सुषमा स्वराज, अरूण जेटली, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी, राजनाथसिंग, कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश कारत, ए. बी. बर्धन, तेलुगु देशम पक्षाचे चंद्राबाबू नायडू, आणि जनता दल युनायटेडचे शरद यादव या नेत्यांनीही संसदेत अण्णांच्या आंदोलनाचा जोरदार आवाज उठवला होता.
गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी मी आणि मुंडे बसलो असताना विलासराव देशमुख यांचा मुंडे यांना फोन आला. आपण कुठे आहात, मी आपणास भेटायला येणार आहे असे सांगून आंदोलनाच्या चौथ्या दिवशी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा निरोप घेऊन विलासराव देशमुख हे गोपीनाथ मुंडे यांच्या निवासस्थानी आले होते. जवळपास दीड ते दोन तास या आंदोलनाबाबत विलासराव देशमुख व गोपीनाथराव मुंडे यांची चर्चा होवून तत्कालीन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व सध्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा झाली. दोन वेळा विलासराव देशमुखांनी त्याठिकाणाहून तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांना फोन जोडून दिला. त्यानंतर पुढील आठ दिवस विलासराव देशमुख व गोपीनाथ मुंडे या दोघांनी समन्वयकाची भूमिका बजावली व सरकारने संसदेत जन लोकपालच्या प्रमुख मागण्यांवर ‘संसद संकल्प’ एकमताने मंजूर केल्यानंतर २८ ऑगस्ट २०११ रोजी संपले. त्यावेळेस अण्णा हजारे यांनी विलासराव देशमुख यांना “सृजन प्रशासक” एक सुसंस्कृत, शब्दाचा पक्का आणि जनभावना समजणारा नेता” म्हणून माध्यमांसमोर आदर व्यक्त केला.
Mansoon : पावसाचा ब्रेक संपला! पुणे, रायगड, अहिल्यानगरमध्ये पावसाच्या सरी बरसल्या…
दरम्यान, रॅमेन मॅगेसेस पुरस्कार घेतलेले सोनम वांगचुक १७ दिवस दिल्लीत उपोषण करत आहेत. मनमोहन सिंग यांच्यासारख्या संवेदनशील व विलासराव देशमुख यांच्यासारखे गुण असणारा एकही नेता भाजप पक्षात नाही व एकाही मंत्र्याने या उपोषणाची साधी दखलही घेतली नाही हे लोकशाहीचे दुर्दैव म्हणावे लागेल, असे शेट्टी यांनी म्हटले आहे. यावरून शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली आहे. नीट पेपर फुटीमुळे २१ विद्यार्थ्यांनी आत्महत्या करूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाझर फुटत नाही. अजूनही वेळ गेलेली नाही केंद्रातील एखाद्या ज्येष्ठ मंत्र्याला पाठवून सोनम वांगचूक यांचे उपोषण थांबवावे, असेही शेट्टी यांनी म्हटले आहे.