पंतप्रधान मोदी अन् अनुराग ठाकुर यांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली
![पंतप्रधान मोदी अन् अनुराग ठाकुर यांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली पंतप्रधान मोदी अन् अनुराग ठाकुर यांच्या विरोधातील याचिका कोर्टाने फेटाळली](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/05/MOdiiiii.jpg)
Petition Against PM Modi and Anurag Thakur Rejected : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या द्वेषपूर्ण भाषणाविरोधात भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) निर्देश देण्याची मागणी करणारी रिट याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.
माजी आयएएस अधिकारी ईएएस सरमा आणि आयआयएमचे माजी डीन त्रिलोचन शास्त्री यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती सतीश चंद्र शर्मा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू होती. याचिकाकर्त्यांची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील संजय हेगडे म्हणाले की 2019 मध्ये न्यायालयाने अशाच एका याचिकेवर विचार केला होता आणि निवडणूक आयोगाकडे उत्तर मागितले होते. मात्र, निवडणूक संपल्यानंतर हा विषय निकाली निघाला.
आम्ही संजय हेगडे यांचं सविस्तरपणे ऐकून घेतलं आहे. त्यानंतर आम्ही कलम 32 अन्वये या याचिकेत काही हस्तक्षेप करण्यास इच्छुक नाहीत असं न्यायालयाने सांगितलं. रिट याचिकेत 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय प्रचारक, विशेषत: भारतीय जनता पक्ष (BJP) द्वारे केल्या जाणाऱ्या द्वेषयुक्त भाषणांविरुद्ध योग्य कारवाई सुरू करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) निर्देश देण्याची मागणी केली होती.
यामध्ये पंतप्रधान मोदींनी (21.04.2024) रोजी आणि केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी 27.04.2024 रोजी दिलेल्या भाषणांचा उल्लेख केला आहे. ही भाषणे भाजपच्या अधिकृत हँडलवर आणि विद्यमान खासदार अरविंद धरमपुरी यांनी इन्स्टाग्राम आणि ट्विटरसारख्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वारंवार पोस्ट केली होती.