राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात…

राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात…

मुंबई : गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. यामुद्द्यावर नुकतेच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केले होते. त्यांच्या याच विधानाचा ठाकरे गटाचे नेते विनायक राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे.

दरम्यान गेल्या काही महिन्यांमध्ये राज्यातील अनेक उद्योग गुजरातसह अन्य राज्यांत गेले. महाराष्ट्रात होणारी कोट्यवधींची गुंतवणूक परराज्यात गेली. याच मुद्द्यावरून राज ठाकरे यांनी भाष्य केले. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्यास काहीही नुकसान होणार नाही.

राज ठाकरे यांच्या याच विधानानंतर आता ठाकरे गटातील नेते विनायक राऊत यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी सुपारी घेऊन बोलायचा धंदा सुरू केला आहे. राज्यातून दोन नव्हे तर पाच मोठे प्रकल्प गुजरात आणि दिल्लीमध्ये गेले आहेत.

त्या प्रकल्पांच्या जोरावरच मोदी यांनी गुजरातची निवडणूक जिंकली आहे. महाराष्ट्र कंगाल केला आणि गुजरातचं भलं केलं आहे. राज ठाकरे याकडे गांभीर्याने पाहात नाहीत हे मनसेचे दुर्दैव आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?
महाराष्ट्र हा सर्वार्थाने श्रीमंत आहे. महाराष्ट्राचं काय होणार? असा टाहो आपण उगाच फोडत असतो. राज्यातून एक-दोन उद्योग बाहेर गेल्याने महाराष्ट्राचं काहीही नुकसान होणार नाही. मात्र, आपण महाराष्ट्र जोपसणं गरजेचं आहे. प्रत्येकाने या गोष्टीकडे नीट बघणं आवश्यक आहे.

दरम्यान, राज ठाकरे यांच्या विधानावर विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, राज्यातून गेलेल्या प्रकल्पावरून राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे. प्रत्येक प्रकल्प महाराष्ट्रात येण्यासाठी सर्व राज्यकर्त्यांनी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे आर्थिक सुबत्तता निर्माण होऊन तेथील भागात रोजगार निर्माण होतील.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube