Kundmala Bridge Accident: नवा पूल उभारण्यासाठी 80 हजार की आठ कोटींचा निधी; संजय राऊतांना चव्हाणांचे पुराव्यासह उत्तर

Kundmala Bridge Accident:पुण्यातील मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील (Indrayani river) लोखंडी पूल (Kundmala Bridge Accident) कोसळला. रविवारी सायंकाळी ही घटना घडलीय. यात चार पर्यटकांचा मृत्यू झालाय. तर 52 जण जखमी आहेत. सोमवारीही बचाव कार्य सुरू आहे. या पुलावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी या नदीवर नवा पूल उभारण्यासाठी केवळ 80 हजार रुपये दिल्याचा दावा केलाय. तसे पत्र सोशल मीडियावर टाकले आहेत. त्याला तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी उत्तर दिलंय.
भाजपचे मावळ तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी मावळ तालुका येथील विविध विकासकामांना पुरवणी अर्थसंकल्प जुलै 2024 अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार राज्य महामार्ग 55 इंदोरी ते कुंडमळा रस्ता 31 व इंद्रायणी नदीवर जोडरस्त्यासह मोठ्या पुलाचे बांधकाम करणे यासाठी रवींद्र चव्हाण यांनी मंजुरी दिली होती. तसेच निधीही मंजूर केला होता. त्याच पत्राचा आधार संजय राऊत यांनी घेतलाय. इंद्रायणी नदीत पूल कोसळून किमान चाळीस जण वाहून गेले. या पुलासाठी आठ कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते म्हणतात. परंतु संबधित मंत्र्याच्या पत्रामध्ये 80 हजार रुपयांचा निधी मंजूर केल्याचे दाखविण्यात आलाय. एकतर मंत्र्याने झोपेत सही केली किंवा जनतेला मूर्ख बनवले जात आहे. फडणवीसांचे राज्य आहे, चालायचेच, असा राजकीय टोला संजय राऊतांनी लगावलाय. (Kundmala Bridge Accident)
संजय राऊतांकडून निव्वळ राजकारण-रवींद्र चव्हाण
माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी संजय राऊत यांना सविस्तर उत्तर दिलंय. इंदोरी ते कुंडमळा येथे जोडरस्त्यासह नवीन पूलाच्या बांधकामास आठ कोटींचा निधी मंजूर केला होता. 2024 व्या पुरवणी अर्थसंकल्पामध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलीय. प्रशासकीय मान्यता झाल्यानंतर विधानसभा आचारसंहिता लागू झाली. दरम्यानच्या काळात सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता व पूलाचे डिझाइन अंतिम करण्यात आले. सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांनी कामाचे कार्यारंभ आदेश दिले असून, एका टप्प्यात काम पूर्ण करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. रवींद्र भेगडे यांनी केलेल्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने शेतकरी व लोकहितासाठी तत्काळ आठ कोटी रक्कमेच्या नवीन पूलास प्रशासकीय मंजुरी दिली. त्यानुसार दिनांक 11 जुलै, 2024 रोजी काम मंजूर केल्याबाबत पत्र दिल्याचे चव्हाण यांनी म्हटलंय.
माझे मित्र व स्वतःला जागतिक दर्जाचे पत्रकार समजणारे संजय राऊत यांनी मी रवींद्र भेगडे यांना दिलेल्या पत्राच्या अनुषंगाने केलेल्या आरोपाची मला कीव येते. कारण अर्थसंकल्पीय पूरकाची पारिभाषा आजपर्यंत संजय राऊत यांना समजलेली दिसत नाही. जुलै, 2024 व्या खर्चाच्या पूरक विवरणपत्रातील पान क्रमांक 553 अनुक्रमांक 765 वर स्पष्टपणे अर्थसंकल्पीय भाषेमध्ये प्रस्तावित रक्कम ही हजारामध्ये नमूद केलेली आहे. याचा अर्थ असा होतो की, छापलेल्या रक्कमेला शंभरने गुणले असता प्रशासकीय मान्यतेची रक्कम आठ कोटी रुपये होते.
एखाद्या लोकप्रतिनिधी किंवा पदाधिकाऱ्यांनी केलेल्या पाठपुराव्याकडे दुर्लक्ष करून काम मंजूर केले नसते तर त्यांनी केलेले आरोप कदाचित परिस्थितीला अनुरूप असते. परंतु लोकांच्या भावनेचा आदर करून मंजूर केलेल्या कामांबाबत असे अपरिपक्वतेचे लक्षण असलेले मत मांडणे, नक्कीच संजय राऊत यांना शोभत नाही. झालेली घटना ही अतिशय दुःखद आहे. मृत व जखमी झालेल्या नागरिकांसाठी सरकार मनापासून ठामपणे उभे आहे. परंतु अशा दुःखद घटनेच्या प्रसंगी संजय राऊत यांनी निव्वळ राजकारण करण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या अज्ञानी वक्तव्ये देणे हे योग्य नाही, असे चव्हाण यांनी म्हटलंय.