संजय राऊत 420 आहेत, त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये; नितेश राणेंचा जोरदार पलटवार
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
Nitesh Rane criticizes Sanjay Raut : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या पुणे दौऱ्यादरम्यान करण्यात आलेल्या सुरक्षा व्यवस्थेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. पत्रकार परिषदेत बोलताना राणे यांनी संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांच्यावर देखील कडाडून टीका केली.
लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार यंदा भारताचे राष्ट्रोय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना प्रदान करण्यात आला. पुण्यात झालेल्या या सोहळ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. या दौऱ्यानिमित्त पुणे शहरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी अमित शाह यांच्यावर टीका करत, तुम्ही मूळचे गुंड आहात, एकतर गुंडासारखे वागा नाहीतर गृहमंत्र्यासारखे वागा, असे वक्तव्य केले होते.
या टीकेला उत्तर देताना नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर पलटवार केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच एका प्रकरणात मोठेपणा दाखवत माफी आणि सुसंस्कृतपणाचा आदर्श घालून दिला. त्यांच्या आणि त्यांच्या आईविषयी अपशब्द वापरण्यात आले तरी त्यांनी संयम आणि मोठ्या मनाने भूमिका घेतली. देशाचा पंतप्रधान म्हणून त्यांनी दाखवलेला हा सुसंस्कृतपणा प्रत्येकासाठी आदर्श आहे.
बाल अत्याचार आणि हत्येच्या प्रकरणात सांगली न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय; आरोपीला मरेपर्यंत फाशी
यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. संजय राऊत यांचे मालक मुख्यमंत्री असताना कोरोना काळात अनेक लोकांचे जीव गेले. पत्रकारांवर खोटे गुन्हे दाखल झाले, समाजात तेढ निर्माण करणारे अनेक निर्णय झाले. मात्र त्या काळात उद्धव ठाकरे यांनी कधीही जनतेची माफी मागितली नाही. जनतेसमोर नाक रगडून माफी मागायला हवी होती. पण उद्धव ठाकरेंसारख्या व्यक्तीकडून आम्हाला तशी अपेक्षाच नाही. हा संस्कारांचा विषय असतो, असे राणे म्हणाले.
संजय राऊत यांना उद्देशून ते पुढे म्हणाले, सुसंस्कृतपणाचे धडे द्यायचे असतील तर त्यांनी आधी मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर जाऊन आपल्या नेत्यांना द्यावेत. इतरांना शिकवण्यापूर्वी स्वतःच्या घरात काय घडले, याचाही विचार करायला हवा. अमित शाह यांच्यावरील टीकेचा समाचार घेताना नितेश राणे अधिक आक्रमक झाले. संजय राऊत यांना इतरांवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही. पत्राचाळ प्रकरणात तुरुंगात जाऊन आलेल्या व्यक्तीने देशाच्या गृहमंत्र्यांवर बोलण्याची हिंमत करू नये. देशाच्या गृहमंत्र्यांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे चुकीचे आहे, असे ते म्हणाले.
तसेच त्यांनी संजय राऊत यांच्यावर भ्रष्टाचाराच्या आरोपांचा संदर्भ देत टीका केली. ज्यांच्यावर आर्थिक गैरव्यवहारांचे आरोप झाले, ज्यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागले, त्यांनी देशाच्या गृहमंत्र्यांवर टीका करणे योग्य नाही, असे म्हणत राणे यांनी राऊत यांच्यावर हल्लाबोल केला. नितेश राणे यांच्या या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून, भाजप आणि ठाकरे गटातील शाब्दिक संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत. अमित शाह यांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून सुरू झालेला वाद आता थेट उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावरील आरोप-प्रत्यारोपांपर्यंत पोहोचला आहे.