मंगळवारी पुण्यात ‘युगांतर 2047’ चे आयोजन; पुनित बालन ग्रुप, सैन्य भरती विभागाचा उपक्रम

Pune News : राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जनमानसात जागरूकता (Indian Army) निर्माण करणे आणि सैन्य दलातील करिअरच्या विविध संधींवर प्रकाश टाकून सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन मिळावे यासाठी भारतीय सैन्य दलाच्यावतीने पुण्यात युगांतर २०४७ चे आयोजन करण्यात आले आहे. सैन्य दलाच्या पुणे भरती विभागाच्यावतीने आणि पुनीत बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा मंच येथे येत्या मंगळवारी (25 मार्च) सकाळी साडेदहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. पुण्यातील प्रसिद्ध संस्थांमधील सुमारे 3 हजार महाविद्यालयीन विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम “युवा, योग आणि तंत्रज्ञान” या थीमवर केंद्रीत असणार आहे.
या कार्यक्रमात वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांची प्रेरक व्याख्याने, भारतीय सैन्यात सामील होण्याबाबत माहिती सत्रे, कॅडेट्सच्या परिवर्तनाच्या प्रवासातील अनुभवांची देवाणघेवाण, प्रसिद्ध वक्त्या जया किशोरी यांचे व्याख्यान, आधुनिक लष्करी तंत्रज्ञानाचे प्रदर्शन करणारे शस्त्र प्रदर्शन, मानसतज्ज्ञ अमित कलंत्री यांचे मन वाचण्याचे सादरीकरण आणि सबली-द बँड यांचे संगीत सादरीकरण यांचा समावेश आहे. आरजे तरुण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे. या कार्यक्रमात ‘राष्ट्र उभारणीकडे’ या विषयावर चर्चासत्र होईल. या चर्चासत्राचा उद्देश राष्ट्र उभारणीत भारतीय सैन्याच्या भूमिकेबद्दल जागरूकता आणि सैन्य दलातील विविध करिअर संधींवर प्रकाश टाकणे आहे.
भारतीय सेना दल आणि पुनीत बालन संयुक्त विद्यमाने ‘युगांतर २०४७ चे’ आयोजन भरती विभाग पुणे आणि पुनीत बालन ग्रुपच्या सहकार्याने आयोजन केलय. सैन्यात भरती होण्यासाठी तरुणांना प्रोत्साहन देणार.#Pune #युगांतर२०४७ pic.twitter.com/Vn2NVVCqd4
— LetsUpp Marathi (@LetsUppMarathi) March 22, 2025
‘युगांतर 2047’ हा केवळ एक कार्यक्रम नाही तर तरुणांना भारतीय सैन्याच्या नीतिमत्तेशी जोडण्यासाठी त्यांची मूल्ये समजून घेण्यासाठी आणि राष्ट्रसेवेच्या संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ आहे. भारताचे भविष्य घडवण्यासाठी शिस्त, नेतृत्व आणि नवोपक्रमाचे महत्त्व हा उपक्रम अधोरेखित करतो असे पुनीत बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन यांनी सांगितले.
आजच्या तरुण पिढीला भारताच्या गौरवशाली इतिहासहाची माहिती करून देण्यासाठी हा एक महत्वाचा प्रयत्न आहे. या एकदिवसीय कार्यक्रमात पुण्यातील विविध शैक्षणिक संस्थांतील 3 हजार विद्यार्थ्यांना भारतीय सेनेची ताकद आणि सैन्य दलाच्या वतीने आत्मनिर्भर भारतासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमात एनडीएचे विद्यार्थी त्यांचे अनुभव कथन करणार असून भारतीय संस्कृतीची झलक दाखविण्यासाठी जया किशोरी यांचेही व्याख्यान होणार आहे. युवा, योग आणि तंत्रज्ञान असा धागा असलेल्या या कार्यक्रमात स्वागतासाठी आम्ही सज्ज आहोत असे मेजर जनरल योगेश चौधरी व्हिएसएम, एडीजी, झेडआरओ यांनी सांगितले.