टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार! अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये?
भारतातील 5 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने होणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे. बीसीसीआय याची घोषणा करणार आहे.
काही महिन्यांवर मेन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेचा थरार रंगणार आहे. (Sprts) या स्पर्धेत एकूण 20 संघांत वर्ल्ड कप ट्रॉफीसाठी चुरस असणार आहे. वर्ल्ड कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान हा भारत आणि श्रीलंकेकडे आहे. स्पर्धेचं वेळापत्रक येत्या काही दिवसात जाहीर होणार असल्याची शक्यता मीडिया रिपोर्ट्समधून व्यक्त करण्यात आली होती. तसंच, बीसीसीआय-आयसीसी यांच्यात झालेल्या बैठकीत भारतातील 5 आणि श्रीलंकेतील 3 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यांचं आयोजन करण्यात येणार असल्याचा दावाही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.
अंतिम सामना कोणत्या स्टेडियममध्ये होणार? याबाबत अपडेट समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्पर्धेतील पहिला आणि अंतिम सामना हा अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. तर, मुंबईत सेमी फायनलमधील 1 सामना होणार आहे. तसंच, स्पर्धेचं आयोजन हे 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान करण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
IND vs AUS 2025 : शानदार! भारताने जिंकली टी-20 मालिका; ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव
भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशात पहलगाम हल्ल्यानंतर संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे आता दोन्ही संघ आयसीसी स्पर्धेतही एकमेकांविरुद्ध एकमेकांच्या घरच्या मैदानात खेळत नाहीत. दोन्ही संघांचे सामने हे त्रयस्थ ठिकाणी होतात. त्यामुळे पाकिस्तान आणि टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचले तर सामना कुठे होणार? हे जाणून घेऊयात. इंडियन एक्सप्रेसनुसार, भारत-पाकिस्तान सेमी फायनलमध्ये पोहचल्यास तो सामना कोलंबोत होईल. तर उपांत्य फेरीतील दुसरा सामना हा मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये होणार आहे.
त्याचबरोबर भारतातील 5 शहरांमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील सामने होणार असल्याचं जवळपास निश्चित समजलं जात आहे. या 5 शहरांमध्ये मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद आणि, चेन्नईचा समावेश आहे. तर श्रीलंकेत कोणत्या शहरात सामने होणार? हे निश्चित नाही. दरम्यान, टीम इंडिया टी 20i वर्ल्ड कप गतविजेता आहे. भारतीय संघाने 2024 साली अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा थरारक झालेल्या सामन्यात धुव्वा उडवला आणि वर्ल्ड कप ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. भारताने रोहित शर्मा याच्या नेतृत्वात ही कामगिरी केली होती.
