धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण द्या..अन्यथा जलसमाधी घेणार, नेवासा फाट्यावर आज उपोषण

  • Written By: Published:
धनगरांना अनुसूचित जमातीतून आरक्षण द्या..अन्यथा जलसमाधी घेणार, नेवासा फाट्यावर आज उपोषण

Dhangar Reservation : धनगर समाजाला अनुसूचित जमाती आरक्षण  लागू व्हावं यासाठी आज बुधवार (दि. 18 सप्टेंबर)रोजी सात जण नेवासा फाटा येथे उपोषणास बसणार आहेत. त्यानंतर आठ दिवसात शासनाने निर्णय न घेतल्यास हे सातही जण गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेणार आहेत, असा इशारा सकल धनगर जमातने दिला आहे. (Dhangar Reservation) दरम्यान, रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत धनगर समाज आरक्षणाबाबत घेतलेली बैठक आम्हाला मान्य नाही व तिथे त्या बैठकीत सहभागी झालेल्या समाजाच्या शिष्टमंडळाला आमची मान्यता नाही, असे स्पष्टीकरणही सकल धनगर समाजाने दिले आहे.

विधानसभेपूर्वी सावध पवित्रा; मराठा आरक्षणावर मोठा निर्णय होण्याची शक्यता, मुख्यमंत्री ऍक्शन मोडवर

धनगर समाजाला भटके विमुक्त (एनटी) मध्ये साडेतीन टक्के आरक्षण असून एवढेच आरक्षण अनुसूचित जमातीमध्ये (एसटी) मिळावे अशी त्यांची मागणी आहे. 2014 मध्ये भाजपने सत्तेवर येताच पहिल्या कॅबिनेटमध्ये हे आरक्षण देऊ, अशी ग्वाही दिली होती. मात्र, दहा वर्षात त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचं सकल धनगर जमातचे म्हणणे आहे. त्यामुळे या मागणीसाठी व धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण प्रमाणपत्र मिळण्यासाठी येत्या बुधवारपासून (18 सप्टेंबर) नेवासा फाटा येथे संभाजीनगर महामार्गावर उपोषण आंदोलन केलं जाणार आहे.

यात महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व भाजपचं उत्तर जिल्हा चिटणीस अशोक कोळेकर यांच्यासह प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे, राजू मामा तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे व भगवान भोजने सहभागी होणार आहेत. उपोषणास बसल्यानंतर आठ दिवसात शासनाने एसटी आरक्षण निर्णय घेतला नाही व प्रमाणपत्र वाटप सुरू केलं नाही तर हे सातही जण गोदावरी नदी पात्रात उडी घेऊन जलसमाधी घेणार असल्याचं माध्यमांशी बोलताना कोळेकर, तागड आणि सोरमारे यांनी स्पष्ट केलं.

या सात जणांपैकी राजू मामा तागड यांनी मागील वर्षी 17 सप्टेंबरला मिरी (तालुका पाथर्डी) येथील वीरभद्र मंदिरात याच मागणीसाठी तेरा दिवस उपोषण केलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संपर्क साधून पन्नास दिवसात मार्ग काढू, असं आश्वासन दिलं होतं. मात्र, वर्ष झालं तरी निर्णय झालेला नाही, असा उद्वेग तागड यांनी व्यक्त केला.

Jammu and Kashmir Assembly Election : जम्मू-काश्मीरमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान

दहा वर्षांपासून तेच ऐकतोय

या संदर्भात सोरमारे यांनी सांगितलं की, मागील महिन्यात पुण्यात झालेल्या बैठकीत संभाजीनगर वा राहुरी येथे उपोषण करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, काही जणांनी अचानक पंढरपूरला उपोषण सुरू केले व आताही आज रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाची बैठक घेऊन धनगर आरक्षणाचा विषय कायद्याच्या चौकटीत बसवू, असं आश्वासन दिलं. मात्र, मागील दहा वर्षापासून आम्ही हेच शब्द ऐकतोय, अशी खंत व्यक्त करून सोरमारे म्हणाले, महाराष्ट्रात धनगर समाज दोन नंबरचा मोठा समाज आहे व आरक्षणाच्या आशेने त्याने भाजपला एकगठ्ठा मतदान केलं आहे. मात्र आरक्षणाचा निर्णय अजूनही झालेला नाही. त्यामुळे आता धनगरी हिसका दाखवला जाणार आहे व 18 सप्टेंबरपासून उपोषण आणि सामुदायिक जलसमाधी आंदोलन केले जाणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.

शिष्टमंडळच मान्य नाही

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीस गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, मंत्री चंद्रकांत पाटील, शंभूराज देसाई व अन्य उपस्थित होते. सकल धनगर समाजाच्या शिष्टमंडळाने या बैठकीस जायलाच नको होतं. या शिष्टमंडळाला समाजाची मान्यताच नाही, असा दावाही सोरमारे यांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube