नामांतराच्या मागणीवर भाजपचे खासदार विखेंचीच नाराजी; बाहेरील व्यक्तीची मागणी संयुक्तिक नाही

नामांतराच्या मागणीवर भाजपचे खासदार विखेंचीच नाराजी; बाहेरील व्यक्तीची मागणी संयुक्तिक नाही

अहमदनगर : शहराचे नाव अहिल्यादेवी नगर करावे अशी मागणी भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी विधानपरिषदेत केली होती. यावर अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपले मत आज प्रसार माध्यमांजवळ व्यक्त केले. जिल्ह्या बाहेरील व्यक्तीने नामांतराची मागणी करणे संयुक्तिक नाही, असे त्यांनी सांगितले.

खासदार विखे म्हणाले, अहमदनगर शहर व जिल्ह्याचे नाव बदलावे ही मागणी कुठेही नाही. माझ्याकडे कोणीही, कधीही अहमदनगरच्या नामांतराबाबत मागणी केली नाही. अहमदनगर शहरातील जनता जोपर्यंत याबाबत मागणी करत नाही तोपर्यंत जिल्ह्या बाहेरील कोणत्याही व्यक्तीने नामांतराची मागणी करणे मला संयुक्तिक वाटत नाही.

जिल्ह्यातील भूमिपूत्राने मागणी केली असती तर त्याला काही महत्त्व आले असते. अहमदनगर महापालिकेतील सर्व नगरसेवक, आमदार, लोकप्रतिनिधींशी चर्चा करू, त्यानंतर होणाऱ्या एकमताशी मी सहमत राहील. पक्ष नव्हेतर जिल्ह्याचा एक नागरिक व खासदार म्हणून जनमानसाच्या भावनेबरोबर मी असेल, असे त्यांनी सांगितले.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्या वर खासदार विखे यांनी सांगितले की, अजित दादांनी हे वक्तव्य करायला नको होते. त्यांनीच अधिवेशनात महापुरुषांबाबत चुकीच्या वक्तव्यावर आंदोलने केली.

ठराव मांडला, गाजावाजा केला आणि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ठराव मांडताना छत्रपती संभाजी महाराजांबाबत वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्या विरोधात भाजपने आंदोलन केले. त्यांना धरणवीर असे आम्ही नाव दिले असल्याची कोपरखळीही त्यांनी यावेळी मारली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube